
साईबाबांच्या इच्छेतून साकारलेल्या शिर्डी येथील साई मंदिराच्या सुवर्ण कळसारोहणाचा 73 वा स्मृतिदिन सोमवारी भक्तीमय वातावरणात साजरा झाला. या सोहळ्यासाठी शताब्दी मंडपात मोठ्या संख्येने साईभक्तांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात मंदिराच्या कळसाचे प्रतिकात्मक पूजन आणि पारनेरकर महाराजांच्या पादुकांचे पूजन करून झाली, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णाचार्य अरविंदराव पाटील होते. तर प्रमुख वक्ते पूर्णाचार्य आनंदराव मुठाळ, संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, अनिल सोनवणे आणि बाळासाहेब जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी 29 सप्टेंबर 1952 रोजी साईबाबांनी स्वतः दृष्टांत देऊन पारनेरकर महाराजांना कळसारोहणाची आज्ञा दिली होती, या दैवी प्रसंगाला उजाळा दिला. अध्यक्ष अरविंदराव पाटील म्हणाले की, साईबाबांनी श्रद्धा-सबुरीचा मंत्र दिला, तर पारनेरकर महाराजांनी त्याला मनीती आणि आचरणाची जोड दिली. या सोहळ्यात माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितले, पुढील वर्षी हा सोहळा सुवर्ण महोत्सवी असल्यामुळे देशभरात विविध उपक्रमांसह तो साजरा करण्याचा संकल्प आहे.
या कार्यक्रमाला कमलाकर कोते, जगन्नाथ गोंदकर, मणिलाल पटेल, विनायक रत्नपारखी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हनुमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर संजयराव मुठाळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर पारनेरकर महाराजांच्या पादुका दर्शनासाठी साई मंदिरात नेण्यात आल्या.




