
आजही मुलगी झाली की अनेक घरात नाकं मुरडली जातात. मुलगी ही परक्याचं धन असतं हे तिच्या मनावर लहानपणातच बिंबवलं जातं. त्यामुळे त्या घरात तिची पाळंमुळं रूजत नाहीत. लग्नानंतरही परिस्थिती तशीच राहते. दुसर्या घरातून आल्यामुळे ती सासरीसुद्धा तिला थारा दिला जात नाही.

घरातील घरपण टिकविण्याची जबाबदारी तीच सांभाळते. अशाच एका घरातील एक घटस्फोटीत महिला रूढी-परंपरेला झुगारून बंड पुकारते. तिची आंतरिक तळमळ दर्शविणारी कलाकृती रविवारी (23 नोव्हेंबर) रंगमंचापर पाहायला मिळाली. नाटकात विचारलेल्या प्रश्नांनी प्रेक्षकांना मात्र स्तब्ध केले.
राज्य नाट्य स्पर्धेत अहिल्यानगरच्या केक फाउंडेशनने सादर केलेल्या व जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘माझं घर’ या नाटकाचे दिग्दर्शन कल्पना नवले यांनी केले. घरातातील प्रत्येक वस्तू व व्यक्तींना मायेच्या ओलाव्याने सांभाळणारी स्त्री मात्र स्वतःचे अस्तित्व हरवून बसते. तिची होणारी घुसमट नाटकाने स्पष्टपणे दाखविण्यात दिग्दर्शक नवले यशस्वी झाल्या. नाटकाचा कालखंड साधारण मोबाईल क्रांतीच्या अगोदरचा म्हणजेच 1990च्या आसपासचा असावा.
तेव्हाची स्त्रीची होणारी ही घुसमट आजही थांबलेली नाही, आणि कदाचित उद्याही थांबेल की नाही याबाबतची असणारी साशंकता दिग्दर्शक नवले यांनी नाटकात मांडली. हृदयाला भिडलेल्या संवादांमुळे नाटक प्रेक्षकांना आवडले.
पडदा उघडताच एका सूखवस्तू घराचे दर्शन होते. दिनेश म्हात्रे या जाहिरात व्यावसायिकाचे ते घर. घरात आई, पत्नी विभा, मुलगी राणी राहतात. मधु हा विभाचा भाऊ व दिनेशची बहीण ऊर्मिला. या सहा पात्रांना सोबत घेऊन नाटक फिरते. उत्तम गृहिणी असलेल्या विभाला पतीची अस्वस्थता खटकते. सर्वकाही सुरळीत आहे असे विभाला वाटत असतानाच एके दिवशी दिनेश विभाला घटस्फोट देण्याविषयी बोलतो. 12 वर्षांनंतर पतीच्या या निर्णयाने तिच्या पायाखालची वाळूच सरकते. विभा खूप साधी राहते, वेळ देत नाही, मनासारखं वागत नाहीत, ही कारणं दिनेश देतो. मुलगी राणीचाही तो विचार करत नाही. ऑफिसमधील नंदिता या आर्टिस्टबरोबर त्याला लग्न करायचे असते. आई व बहीण या दोघींचाही त्यास विरोध असतो. या दोघी विभाची बाजू घेतात, अर्थात त्या दोघींचेही विभाशी प्रेमळ, आपुलकीचे संबंध असतात. दिनेश दुसरं लग्न करतो. मात्र विभा घर सोडण्यास नकार देते. आई दिनेशलाच घराबाहेर काढते. त्यानंतर माहेरी गेलेल्या विभाला भांड्यांवरील सर्व नावांवर असणारे आईचे नाव अस्वस्थ करते. जीवापाड जपलेल्या सर्व वस्तूंचे घर आपलेच आहे याची जाणीव तिला होते. त्यानंतर पुन्हा सासरी येते. ते घर तिचेच असल्याचे आई तिला सांगते.
बिनधास्त व स्वतंत्र विचाराची असणारी ऊर्मिला भलतीच प्रॅक्टीकल असते. रूढी-परंपरा तिला मान्य नसतात. स्वच्छंदी जगणार्या मुलींचे जणू प्रातिनिधीक चित्रण ती नाटकातून दर्शविते. आपल्या बाजूने भक्कमपणे बोलणारी आई व ऊर्मिला मात्र दिनेशला नंदितापासून मूल झाल्यानंतर बदलल्याचे विभाला सतावते. भाऊ मधू विभासाठी लग्नासाठी स्थळ आणतो. मात्र, त्याने माझ्या घरात येऊन राहावे आणि इथल्या माणसांशी आपुलकीने, प्रेमाने वागावे अशी तिची इच्छा असते. तो जर लग्न करून या घरात येणार असला तरच लग्न करेन यावर ठाम राहून प्रश्न समाजाला निरूत्तर करते. अशा एका वेगळ्या शेवटाने नाटक संपते. गुंतागुंतीच्या विषयावर नेमकेपणाने बोट ठेवणारी स्त्रियांची घुसमट नाटकाने उत्तम दर्शविली. कलाकारांच्या तोडीस तोड अभिनयामुळे आणि तांत्रिक बाजूंची योग्य साथ मिळाल्याने नाटक सादरीकरण उत्तमरित्या करण्यात दिग्दर्शक कल्पना नवले यांनी बाजी मारली.
विभा हे सर्वसामान्य गृहिणीचे पात्र चैत्राली जावळे यांनी साकारले. स्त्रीची घुसमट, अगतिकता आणि निग्रहीपणा त्यांनी आपल्या हावभावांतून ठळकपणे दर्शविला. देहबोलीचीही साथ चांगली मिळाली. दिनेश हे पात्र नितीन जावळे यांनी निभावले. रागीट आणि गंभीर भाव त्यांना चांगले जमले. एका संवादात मात्र ते अडखळले.
आईच्या भूमिकेतील कल्पना नवले यांनी नैसर्गिक अभिनय केला. सुनेची अवहेलना सहन न झाल्याने दुःखी झालेली सासू, कठोर आई त्यांच्या अभिनयाने छान रंगवली. दिनेशच्या वागण्याने व्यथित झाल्यानंतर त्या खरोखरंच रडल्या की काय असे वाटले. अभिनय खूपच समाधानकारक होता. आवाजातील चढउतारही झक्कास. ऊर्मिला हे पात्र पहिल्यांदाच नाट्य रंगमंचावर पाय ठेवणार्या करिश्मा कोठारी-जोशी यांनी उत्तमरित्या वठवले. भावजयीशी असणारा जिव्हाळा त्यांच्या चेहर्यावर जाणवला.




