अहिल्यानगर मधील मिशन सुधारमध्ये 13 हजार रेशनकार्ड बाद

सरकारच्यावतीने गरजू व पात्र रेशनकार्डधारकांनाच सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, यासाठी मिशन सुधार या कार्यक्रमांतर्गत रेशनकार्डाची छाननी सुरू आहे.
यामध्ये अपात्र, बनावट, मृत व्यक्ती, स्थलांतरित व निष्क्रिय असे 13 हजारांवर रेशनकार्ड पडताळणीअंती पुरवठा विभागाद्वारे बाद करण्यात आला असून परिणामी 212 मेट्रिक धान्य जिल्ह्याचे घटले आहे.
पुरवठा विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या पडताळणी मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 12 हजार 631 संशयास्पद रेशनकार्डधारक अपात्र आढळले असून त्यांचे धान्य तातडीने बंद करण्यात आले आहे.
शासनाकडून जिल्ह्यातील 38 हजार 737 संशयास्पद लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली होती. या यादीतील शंभर टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली आहे. पडताळणी झालेल्यांपैकी 12 हजार 631 लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
मिशन सुधार योजनेत लाभार्थ्यांची संख्या घटल्याने जिल्हा पुरवठा विभागाला जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यासाठी धान्य कमी आले आहे. यात प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना पाच मेट्रिक टन गहू वाढून मिळाला आहे, तर 392 मेट्रिक टन तांदूळ कमी झाला आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचा 65 मेट्रिक टन गहू घटला आहे, तर 44 मेट्रिक टन तांदूळ कमी झाला आहे.
अन्नसुरक्षा योजनेतील गैरव्यवहार रोखणे आणि बोगस शिधापत्रिका रद्द करण्यासाठी शासनाने मिशन सुधार मोहीम सुरू केली होती.
याद्वारे डेटा विश्लेषणातून प्राप्त संशयास्पद, दुबार व मृत लाभार्थ्यांची ई-पॉस व प्रत्यक्ष तपासणी करून बोगस नावे डिलीट केली आहेत.




