
राज्य सरकारच्या रेशनिंग योजनेतील स्वस्त धान्य असलेला शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) जामखेडमध्ये पकडला असून, 400 गोण्या तांदुळासह 30 लाख रूपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित आरोपी पसार आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विश्वास बेरड, बिरप्पा करमल, हृदय घोडके, रोहित मिसाळ आणि भगवान धुळे यांचे पथक गुरूवारी (26 जून) जामखेड पोलीस ठाण्यात अवैध धंद्यांची माहिती काढत असताना जामखेड ते करमाळा रस्त्याने शासकीय रेशनचा तांदूळ घेऊन एक ट्रक सांगलीकडे जाणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, जामखेड येथील आयटीआय परिसरात सापळा रचण्यात आला.
संशयित ट्रक (एमएच 17 बीडी 8102) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 400 गोण्यांमध्ये भरलेला तांदूळ आढळून आला.
चालकास विचारणा केली असता त्याने आपले नाव सुंदर बबन घुमरे (वय 60, रा. लोणी, ता. जामखेड) असे सांगितले. ट्रकमधील तांदूळ हा रेशन योजनेतील असून तो जामखेड येथील योगेश मोहन भंडारी याच्या दुकानातून घेऊन सांगली येथे विक्रीसाठी जात असल्याची कबुली त्याने दिली. या कारवाईत एकूण 400 गोण्या तांदळ आणि ट्रक असा एकूण 30 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जामखेड पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिकांच्या आशीर्वादाने काळाबाजार ?
जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशनचा काळा बाजार होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन तहसीलदार यांनी पकडले होते. मात्र तरी देखील रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्याचे प्रमाण थांबले नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथुन येऊन जामखेड शहरात कारवाई केली मात्र स्थानिक तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन काय करते असा सवाल उपस्थित केला जात आहे.




