अहिल्यानगरमधील ४०० वर्षांची ऐतिहासिक ‘माळीवाडा वेस’ पाडली जाणार… नागरिक, इतिहास प्रेमींमध्ये नाराजी

अहिल्यानगर महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ‘माळीवाडा वेस’ या नावाने ओळखली जाणारी सूमारे ४०० वर्षे जुनी, ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना १७ डिसेंबरपर्यंत मागवल्या आहेत. महापालिकेच्या या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये, इतिहासप्रेमींमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
मूळ अहमदनगर या नावाने ओळखले जाणाऱ्या व गेल्या वर्षी अहिल्यानगर असे नामांतर झालेल्या शहराची स्थापना १४९० मध्ये मलिक अहमदनगर निजामशहाने केली. त्यानंतर मुघल सरदार सर्जेखान याने संरक्षणासाठी शहराभोवती १६३१ मध्ये ११ वेशी उभारल्या. शहराचे प्रवेशद्वार म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. जकात, येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर होत होता..
पुढे शहर विकसित होताना सर्जेपुरा, नालेगाव, बंगाल चौकी, किंग्स गेट, मंगलगेट आदी भागातील ९ वेशी कालौघात नामशेष झाल्या. सध्या केवळ माळीवाडा व दिल्ली दरवाजा या दोन वेशी आपले अस्तित्व टिकवून आहेत. विशेष म्हणजे दोन्ही सुस्थितीत आहेत. मध्यंतरी दिल्ली दरवाजा वेस वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या नावाखाली हटवण्याचाही निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे तो बारगळला.



