
आई-वडिलांनी पोटगी मिळवण्यासाठी मुलांसोबत राहणं गरजेचं आहे, असा कोणताही कायदेशीर अट नाही, असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील एका प्रकरणात, महिलेने आपल्या दत्तक मुलाकडे पोटगीसाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र, आई मुलीकडे राहत असल्याने पोटगीसाठी अपात्र ठरते, असा युक्तिवाद विरोधी पक्षाने केला होता. न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत हा निर्णय दिला.
या प्रकरणात नागपूर खंडपीठाने निरिक्षण नोंदवले की, आपल्या मुलांकडून पोटगी घेऊन आई वडील त्यांच्या इच्छेनुसार स्वतंत्र राहू शकतात. त्यांना मुलांसोबत राहायला अनिवार्य करणे चुकीचे आहे. त्यांना पाल्यांसोबत राहण्यास भाग पाडणं, म्हणजे त्यांचा शांतपणे आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखं आहे, असं स्पष्ट मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम जोशी यांनी दिले आहे.
नागपूरच्या खंडपीठाने हा निर्णय वाशिम जिल्ह्यातील एका प्रकरणात दिला आहे. संबंधित महिला आपल्या मुलीकडे राहत आहे. मुलगा पालनपोषण करण्याचे कर्तव्य विसरल्यामुळे तिला नाइलाजास्तव मुलीच्या घरी आसरा घ्यावा लागत आहे.
तिने आपल्या दत्तक मुलाकडे देखभाल खर्चाची मागणी केली होती. त्याने पोटगी देण्यास नकार दिला. या प्रकरणात मुलाने दावा केला की, आई मुलीकडे राहत असल्यामुळे त्यांना पोटगी मागण्याचा हक्क नाही.
यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. मुलाने केलेल्या दावा न्यायालयाने फेटाळून लावला. ‘केवळ मुलासोबत राहणं नाकारल्यामुळे आई पोटगीसाठी अपात्र ठरत नाही’ असं खंडपीठाने आदेशात नमूद केलं.
विशेष म्हणजे या प्रकरणात संबंधित महिलेने त्या मुलाला दत्तक घेतलं होतं. त्यामुळे त्याच्यावर नैतिक जबाबदारी असून, पोटगी देणं ही त्याची कर्तव्य आहे, असंही न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केलं.




