
राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केरळमध्ये मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत आहेत. आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाट, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
तसेच पुढील ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता असून माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे.
मान्सूनचाप्रवास कालपर्यंत लक्षद्वीपपर्यंत पोहोचला होता. मात्र आज त्याची पुढील वाटचाल थोडी मंदावली. तरीदेखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून पुढील २ ते ३ दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढू शकेल असाही अंदाज हवामान खात्याने आहे. तसेच मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार,आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाट आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.




