अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल २७ वर्षांनंतर झालं रेकाँर्ड तोडले…

साधारणपणे उष्णतेसाठी ओळखला जाणारा मे महिना यंदा अवकाळी पावसामुळे चर्चेत आला आहे. मागील २७ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पावसाची शंभरी पार झाली असून, आतापर्यंत तब्बल १०४.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा अनेकपटीने अधिक असून, मान्सूनपूर्व पावसाचा प्रारंभ अवकाळीनेच केल्याचे चित्र दिसत आहे.
सामान्यतः मे महिन्यात सरासरी १८.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा, मे महिना संपण्याआधीच पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे १९९८ ते २०२५ दरम्यान केवळ चार वेळा मे महिन्यात ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली होती, आणि यंदा ती पातळीही पार करून १०० मिमीच्या पुढे गेली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून केरळमध्ये येण्याची वेळ जून पहिल्या आठवड्यात अपेक्षित होती. मात्र, यावर्षी मान्सून २४ मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तो ५ किंवा ६ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्या आधीच, ५ मेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच जाणवत आहे.
चास : १४५.२ मिमी
वाळकी : १२५ मिमी
केडगाव : ११९.६ मिमी
रुईछत्तीसी : ११४.७ मिमी
तसेच पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्येही १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
परिणामी, लग्न समारंभात अडथळे, कांदा पिकांचे नुकसान, आणि बसस्थानक परिसरात चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.