सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील प्रत्येक आरोपीला शिक्षा होईल
अहमदनगर प्रतिनिधी - संगीता खिलारी..

बीड मस्साजोग येतील सरपंच यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली, यातील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे.
देशमुख कुटुंबीयासोबत शासन खंबीरपणे उभे आहे ही हमी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश आपणास देत आहोत.अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देशमुख कुटुंबीयांना दिली.
उद्योग मंत्री यांच्यासोबतच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी आज या परिवाराच्या सांत्वनासाठी भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांसोबत देखील चर्चा करून त्यांची म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणात असणारे मुख्य आरोपी तसेच त्यामागील सूत्रधार यांना आठवड्याभरात अटक करून कारवाई करण्यात येईल असे याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी गावकऱ्यांशी बोलताना सांगितले. शिरसाठ यांनी आज येथे भेट देण्यापूर्वी बीड येथे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन याप्रकरणी होत असलेल्या तपासाची माहिती घेतली.
यावेळी देशमुख कुटुंबीयांनी चर्चा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आलेली असून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर दोषीना शिक्षा व्हावी तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत असेही ते म्हणाले.
पंधरा वर्षे सार्वजनिक जीवनात राहून स्वतःचे साधे घरही न बांधणारे दिवंगत सरपंच देशमुख यांची गावाच्या विकासाची तळमळ त्यांच्या कामातून लक्षात येते व या पुढील काळातही त्याच प्रकारचा विकास या गावात होईल याची खबरदारी शासन घेईल असे सामंत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सांगितले.
जी घटना घडली ही अतिशय निंदनीय आहे याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण तपासाचे निर्देश दिले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यास शासन कटीबद्ध आहे असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी भेटीदरम्यान सांगितले.