‘या’ भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा
महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस अद्यापही काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हजेरी लावून गेलेला नाही. त्यामुळं इथं चिंता वाढताना दिसत आहे.

यंदा पावसानं राज्याच प्रवेशही उशिरानं केला आणि तो खऱ्या अर्थानं मुसळधार बरसू लागला तोसुद्धा काहीसा उशिरानंच. असा हा पाऊस सध्या गणेशोत्सव गाजवताना दिसत आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळतेय. त्यातच पुढच्या 24 तासांमध्येसुद्धा पाऊस राज्याच्या बहुतांश भागांना ओलंचिंब करून जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं असलं तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देणार असून, तिथं उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार ही बाब मात्र नाकारता येत नाही.
फक्त कोकणच नव्हे तर, राज्यात सध्या वर्धा, चंद्रपूर, अमरावती यांसारख्या भागांमध्ये चांगला पाऊस होताना दिसत आहे. तिथं मराठवाड्यातही बीड, जालन्यात पावसानं हजेरी लावली आहे. पण, मराठवाड्यातील निवडक जिल्हे वगळता इतर भाग मात्र कोरडाच आहे. इथं मुंबईतही पावसाच्या सरी अधूनमधून आपल्या असण्याची जाणीवर करून देतात. पण, भर दुपारी येणारी सूर्यकिरणं अंगाची काहिली करताना दिसत आहेत.
शुक्रवारीसुद्धा शहरात ऊन पावसाचा हा खेळ पाहायला मिळेल. ज्यामुळं वातावरण काही अंशी दमट असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे आणि पुण्यातच पुढच्या काही तासांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसणार असून, वादळी वारेही सुटण्याची शक्यता आहे. तर, सातारा, जळगाव, अहमदनगर, सांगली, लातूर, औरंगाबाद, रायगड, पालघरमध्ये पावसाची संततधार सुरु राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.