
आषाढी एकादशी म्हणजे वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव. आषाढी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलने बाल दिंडीचे आयोजन करून महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वैभवाचे संस्कार दर्शविले.


या दिंडीमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी पर्यंतचे सर्व बाल वारकरी हरिभक्तित तल्लीन झाले.

विठूनामाच्या जयघोषांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीत शाळेतील विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी, विविध संत तसेच वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत टाळ, वीणा, भगवे ध्वज व तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले होते.



ढोल पथक, लेझीम पथकासह निघालेली ही दिंडी वाजत गाजत, विठ्ठल नामाचा जयघोष करत तारकपूर परिसरातून फिरून विवेकानंद स्कूलमध्ये आली.
शाळेमध्ये आल्यावर पारंपारिक पद्धतीने औक्षण व आरती झाल्यावर अतिशय भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी विठुरायाचा जयघोष केला. त्यानंतर लेझीम, टाळ तसेच झेंडे यांचे पारंपारिक प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच पूर्व प्राथमिकच्या छोट्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या गीतांवर ठेका धरला.



तसेच शाळेतील संगीत शिक्षक श्री. पठारे यांनी इतर शिक्षिकांच्या सहकार्याने ‘मोबाईल नको ग बाई’ या भारुडातून मोबाईलचे तोटे प्रतिपादित केले.
तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी संत जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या व संत नामदेवांची खीर या दोन नाटिका सादर करून या संतांची आपल्या लाडक्या विठोबा प्रती असलेली भक्ती दाखवून दिली.
या भक्तिमय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनीष अहुजा तसेच सौ करिष्मा नवलानी व भावना ढाले यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. राम मेंघानी, उपाध्यक्ष श्री. रूपचंद मोटवानी, सचिव श्री. गोपाल भागवानी, खजिनदार श्री. दामोधर माखिजा, विश्वस्त श्री. महेश मध्यान, श्री. सुरेश हिरानंदानी, श्री. राजकुमार गुरुनानी, श्री. हरेष मध्यान या बालदिंडीत सहभागी झाले होते तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या तसेच दिंडीत सहभागी झालेल्या सर्व बाल वारकऱ्यांचे कौतुक केले .
याप्रसंगी बोलताना शाळेच्या प्राचार्या गीता तांबे यांनी विठुरायाकडे जनकल्याणाचे साकडे घातले. तर मुख्याध्यापिका सौ कांचन पापडेजा यांनी दिंडी सारख्या उपक्रमातून आपला पारंपारिक वारसा प्रत्येकाने जोपासण्याचे आवाहन केले.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




