जीवनात स्थैर्य हवे असेल तर धैर्य धरावेच लागेल. प्रेरणादायी वक्ते – दत्तात्रय वारकड
अहिल्यानगर

जिल्हा शासकीय कोषागार कार्यालय , अहिल्यानगर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन.

सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगामध्ये मानवाचे जीवनमान गतिमान झालेले आहे यंत्र आले तंत्र आले प्रगती झाली आज मानवाला कुठलीही गोष्ट अशक्य अशी राहिलेली नाही ए आय तंत्रज्ञान त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये तांत्रिक पद्धतीने झपाट्याने झालेली प्रगती यामुळे मानव यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसलेला आहे.अशा या गतिमान जीवनामध्ये मानवाचे जीवन अतिशय वेगवान झाले आहे .
निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीमध्ये मानव हा एकमेव बुद्धिजीवी जीव आहे असं आपण मानतो परंतु सुख-समृद्धीच्या गराड्यात अडकलेल्या आणि तथाकथित प्रगतीच्या हव्यासाने झपाटलेल्या मानवाला आता मात्र स्वतःचाच विसर पडलेला आहे. भौतिक वस्तूच्या सुख-समृद्धीमध्ये मानव आपली मन: शांती हरवून बसलेला आहे. जगामधील कितीही मौल्यवान व महागड्या भौतिक वस्तूंचा उपभोग घेऊ द्या परंतु शांत झोप ,सुखी आणि समाधानी जीवन , निरोगी जीवन हेच खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाचे मूलभूत व आधारभूत घटक आहेत. मानसिक सुख शांति करिता , आनंदी जीवनाकरिता कुठल्या प्रकारची जीवन प्रणाली जीवनामध्ये अंगिकारावी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी कोषागार शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना केले.

जीवनात सकारात्मक, प्रभावी, बलाढ्य आणि बळकट स्वरूपाची विचारसरणी अंगीकारणे काळाची गरज आहे. सोशल मीडिया, मोबाईलचा अतिरिक्त वापर, व धावपळीचे जीवन याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कळत नकळत विघातक स्वरूपाचा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत न डगमगता जीवनात येणाऱ्या आव्हानांना सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे.
कवी कुसुमाग्रज यांच्या – असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या प्रेरणादायी कवितेचा दाखला देत सर्व उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वक्ते दत्तात्रय वारकड यांनी मिळवला.
श्रोत्यांनी देखील प्रचंड टाळ्यांनी मनमुराद प्रतिसाद दिला व या प्रेरणादायी व्याख्यानाचा आनंद लुटला. पुढे वक्ते दत्तात्रय वारकड म्हणाले की आनंदी जीवन म्हणजे आयुष्याचा आनंदोत्सव होईल परंतु याकरिता आपण आपल्या जीवनामध्ये जर स्थैर्य हवे असेल तर धैर्य धरावेच लागेल. याकरिता आपण आपल्या स्वतःचा आत्मिक विकास साधावा, स्वतःचा आदर करावा व इतरांचाही आदर करावा, आपली भारतभूमी ही अनेकविध संत महंत शूर वीर महान विभूती यांच्या सर्वस्वी योगदानातूनच वंदनीय , प्रशंसनिय व महानतेचे प्रतीक बनली आहे.
आज आपण या सर्व महान विभूतींनी दिलेल्या योगदाना मुळे च सुख समृद्धीची फळे चाखत आहोत त्यांच्या महान योगदानाचा व आदर्शवादी व्यक्ती चारित्र्याचा आपण अभ्यास, वाचन करून त्यांच्या विचारांचा सांस्कृतिक वारसा जोपासावा व हीच आदर्शवादी शिकवण येणाऱ्या भावी पिढीला द्यावी.संत ज्ञानेश्वर माऊली , हिंदवी स्वराज्य चे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रभावशाली आत्मचरित्रांचा आपण अभ्यास करून त्यांच्या विचारांतून आपण प्रेरणा घ्यावी व त्यांचे विचार अंगी जोपासावेत असे आवाहन दत्तात्रय वारकड यांनी उपस्थितांना केले.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयाचे अपर कोषागार अधिकारी श्री कुशाबा पिसे, श्री रविंद्र काजळकर, श्री संतोष ताठे, व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घनवट यांनी केले तर श्री मयूर सूर्यपुजारी यांनी आभार मानले . हा कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री राजकुमार पुंड सहाय्यक कोषागार अधिकारी , (नेवासा) व ओ.एस श्री सुधीर देशपांडे यांचे सहकार्य लाभले.



