ऐन सणासुदीच्या काळात नारळ महागले, खोबरे झाले ३४० रुपये किलो तर खोबरेल तेलही महागले..

गणेशोत्सव म्हटलं की देवपूजा, प्रसाद, मोदक आणि विविध मिठाई यांचा अनिवार्य संबंध असतो. या सर्व तयारीत नारळ आणि खोबरे महत्त्वाचे घटक असतात. मात्र, यावर्षी उत्सवाच्या अगोदरच नारळ-खोबऱ्याचे भाव आकाशाला भिडले असून सर्वसामान्य भक्तांच्या खिशाला चांगलाच ताण बसला आहे.
महागाईचा नारळावर परिणाम..
साधारणपणे २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ सध्या ३० ते ३५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर तीनशेच्या घरात असलेले सुके खोबरे आता ३६० ते ३८० रुपये किलो दराने विकले जात आहे. दरवाढीमुळे घरगुती पूजा करणाऱ्या कुटुंबांपासून सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत साऱ्यांनाच अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे.
खोबरेल तेलही महागले..
खोबरेल तेलाच्या किमतीतही मोठी झेप झाली आहे. एका लिटर घाण्याचे तेल आता तब्बल ६०० रुपयांपर्यंत विकले जात आहे. परिणामी, गोडधोड पदार्थ बनवणारे तसेच प्रसादासाठी नारळ-खोबऱ्याचा वापर करणारे विक्रेते व गृहिणींनाही जादा खर्च करावा लागत आहे.
परराज्यातून आवक घटल्याचा परिणाम
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, परराज्यातून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यात सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने मागणी वाढली असून, दरात चढ-उतार होण्याऐवजी सरळ दुप्पट वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम खोबरे आणि तेलाच्या भावावरही झाला आहे.
भक्तांची चिंता वाढली
गणेश चतुर्थीच्या तयारीत मोदक, लाडू आणि मिठाईत नारळाचा वापर महत्त्वाचा मानला जातो. तसेच देवाला नारळ अर्पण करणे ही परंपराही आवश्यक मानली जाते. मात्र, दरवाढीमुळे “देवाला नारळ कसा वाहायचा? मिठाईत नारळ कसा घालायचा?” असा प्रश्न अनेक भक्तांना भेडसावतो आहे.
दोन महिन्यांतच भाव दुपटीने वाढले
गेल्या दोन महिन्यांत नारळाचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत. पन्नाशीच्या घरात गेलेले नारळ, तसेच किलोमागे ३८० रुपये झालेले खोबरे, ही वाढलेली किंमत सणासुदीच्या खर्चात अतिरिक्त ओझं ठरत आहे. परिणामी, या गणेशोत्सवात भक्तीइतकीच महागाईची चर्चा रंगणार हे नक्की.




