मिटकरींचं धनंजय मुंडेंना धक्का देणार वक्तव्य, अजित दादांकडे केली मोठी मागणी
अहमदनगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता.
काही मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं बोललं जातं होतं. मात्र त्यानंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 19 मंत्री तर शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खाते वाटप देखील करण्यात आलं.
दरम्यान खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या संदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. ‘दादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होता त्यावेळी कोयतागँगचा बंदोबस्त करुन कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे हें सिद्ध करुन दाखवलं.
यावेळी पुणे जिल्ह्यासोबत बीड व परभणी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारा जेणेकरून परत संतोष देशमुख प्रकरण या राज्यात होणार नाही’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.