
दि. 28/11/2023 ते 29/11/2023 या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे.तसेच जायकवाडी धरणासाठी प्रवरा नदीस भंडारदरा धरणातून 9,404 क्युसेक, निळवंडे धरणातून 10,001 क्युसेक तर ओझर बंधा-यातुन 9,243 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.मुळा धरणातून मुळा नदीस 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीस 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
1) मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.
3) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.
4) वीजा चमकत असतांना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
5) स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.
6) अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
7) धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.
सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा.
तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा