ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

लेख – निसर्ग माझा सखा – परोपकारी निसर्ग.

अलका गोविंद पितृभक्त . जळगाव

“अग ये सीमा “काय करतेस; काही नाही ग विणा आज जरा नर्सरीतून नवीन रोप आणले त्यांची लागवड करते. ‘तुला फार छंद’ या झाडावेलींचा. किती कचरा होतो इकडून तिकडे सारखं झाडू मारावा लागतो. मला तर मुळीच पटत नाही. “अगं वेडाबाई तुकाराम महाराजांनी उगाच म्हटले आहे का “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” असे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे आपण वंशज. निसर्ग दत्त देणगी असलेले आकाश, जमीन ,पाणी, सूर्यप्रकाश , हवा सार काही परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केले आहे आणि तेही मानव कल्याणासाठीच.

अनेक असती मजला

  आप्तस्वकीय नातीगोती

  जगात सर्वात सुंदर आहे

  निसर्ग माझा सखा सोबती.”

निसर्ग म्हणजे‌ एक जादूगारच होय!! कधी पावसात भिजवतो , तर कधी थंडीची हुडहुडी भरवणारा आणि उन्हाच्या तप्त झळांनी हैराण करणारा. पशुपक्षी मानवासह सावली शोधायला लावणारा, असा हा निसर्ग म्हणजे पूर्वीपासून मानवाचा जिवलग मित्रच .

प्राचीन काळापासून जीवापाड निसर्गावर प्रेम करणारा माणूस जंगल हेच त्याचा निवारा ,झाडाची पाने हेच त्याचे वस्त्र ,कंदमुळे फळे हेच त्याचे अन्न.तसेच वेगवेगळ्या ऋतूत येणाऱ्या फळे, भाजीपाला ,अन्नधान्य, यानुसार माणूस सण समारंभ साजरा करत होता. ही निसर्गनिर्मित किमया मानवाला थोडीच जमणार. प्रत्येक फुलात नाना तऱ्हेचे रंग भरणे ,प्रत्येक फळाची रचना आणि त्याचा रंग त्याची निर्मिती करणे, प्रत्येक भाजीपाला विशिष्ट ऋतूत मुबलक प्रमाणात निर्माण करणे, कंदमुळे फळे वनौषधी हे सर्वच निसर्ग दत्त देणगीच होय.

संस्कृत सुभाषितकाराने म्हटलेले आहे.

परोपकारा फलन्ति वृक्ष

 परोपकाराय वहन्ति नद्य |

 परोपकाराय दुहंति गाव:

 परोपकारार्थं इदम शरीरम ||

झाडे, नदी ,गायी ,पर्वत, लता वेली हे सर्वच देवाने परोपकारासाठी निर्मिलेले आहे. नेहमीच ते मानवाला उपयोगी पडतात अगदी शुद्ध हवेपासून ते फुले फळे आणि इंधन सुद्धा आपल्यासाठीच देतात . गाई इतरांसाठी दूध देतात ,नद्या इतरांसाठी वाहतात ,म्हणजेच ते परोपकारासाठी आहे तसेच आपले शरीर सुद्धा परोपकारासाठीच देवाने निर्मिलेले आहे .वनस्पती पासून वनौषधी म्हणजेच अडुळसा, कोरफड ,घायपात , बेल पान, यांचा औषध म्हणून उपयोग होतो.

आकाशात दिसणारे चंद्र, सूर्य, तारे, ग्रह गोल हे सुद्धा निसर्गाचाच एक भाग . रोज सूर्य उगवतो आणि मावळतो प्रकाश आणि उष्णता देतो. चंद्र सुध्दा शितलता देतो. रोज उगवणे आणि मावळणे असे रोजचे जणू वेळापत्रक तयार करणारा हा निसर्गच.

निसर्ग म्हणजे आपला गुरुच त्याने आपल्याला भरभरून दिले आहे हवा म्हणजे प्राणवायू, जमीन म्हणजे शेतकरी बांधवांची काळी आई, नद्या नाले समुद्र त्यायोगे मिळणारे पाणी हे सगळेच निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत आणि या घटकांमुळेच मानवाची प्रगती होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे माझी काव्य लेखणी सुद्धा या निसर्गाच्या सानिध्यात भराभर चालते आणि काव्यलेखन केव्हाच पुर्ण होते कळत नाही.

अगं विणा तुला एक महत्त्वाचे सांगायचे राहिलेच ग; अग!!! हा निसर्ग जसा मित्र आहे तसा तो शत्रू देखील आहे. जेव्हा केव्हा मानव त्याच्या हव्यासापायी त्याच्यावर आघात करतो तेव्हा तो त्याचे रौद्ररूप धारण करतो . त्सुनामी,ओला कोरडा दुष्काळ, भूकंप ,वादळ अशा अनेक संकटांनी मानवावर तो कुरघुडी करतो. कारण मानवाला त्याची चूक कळावी म्हणुनच….

खरंतर हा निसर्ग आपणास अनेक गोष्टीतून आनंद देतो. नदी व समुद्रकाठी येणारी पाण्याची गाज व त्यातून येणाऱा सुमधुर आवाज , निळ्या आकाशातून मिळणारी समानतेची शिकवण ऋतुमानानुसार बदलणारे वसुंधरेचे रंग मनाला अल्हाददायी वाटतात. नवनवीन गोष्टींची शिकवण देणारा हा सखा, मित्र, सोबती याचे रक्षण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे .याची हानी होणार नाही म्हणून खालील प्रतिज्ञा करूया.

 मी झाडे लावेन झाडे जगवेन.

 हवा व पाणी यांचे प्रदूषण करणार नाही .

फटाके व रासायनिक रंग वापरणार नाही .

ओला व सुखा कचरा यांची योग्य विल्हेवाट लावेल.

 पाण्याचा जपून वापर करेन.

माणुसकी धर्म जोपासून प्रत्येकास मदत करेल. आणि माझ्या निसर्गाचे संरक्षण करेल.

धन्यवाद…

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे