तृतीयपंथीयांना गणरायाच्या आरतीचा मान
मुंबई - मराठमोळ्या भाजप नेत्याचे दिल्लीत कौतुकास्पद पाऊल

सुखकर्ता, दु:खहर्ता ही गणरायाची आरती सुरू झाली आणि ‘त्यांनी’ आरतीचे तबक सावरत थरथरत्या हाताने आरतीला सुरुवात केली.
पाहता पाहता त्यांच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली. समाजाकडून नेहमी अपमान व हीनतेचीच वागणूक अनुभवणाऱ्या त्या तृतीयपंथीयांना, आपल्याला एका राजकीय नेत्याकडील गणेशोत्सवात आरतीचा मान दिला जाईल, याची कल्पनाही केली नसेल. पण तसे घडल्याने ते विलक्षण भावूक झाले होते. भाजप नेते सुनील देवधर यांच्या दिल्लीतील घरच्या गणेशोत्सवात नुकताच घडलेला हा प्रसंग तेथे उपस्थित असणाऱ्यांनाही वेगळा अनुभव देऊन गेला.
देवधर यांच्याकडे त्रिपुराची सूत्रे आली, तेव्हापासून दरवर्षी दिल्लीत नॉर्थ अॅव्हेन्यू भागातील त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. नॉर्थ व साऊथ अॅव्हेन्यू तसेच विश्वंभरदास मार्गावरील खासदार, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल यांची त्या काळात सकाळ-संध्याकाळच्या आरतीला वर्दळ असते.
या सर्वांबरोबरच सफाई कर्मचारी, अनाथाश्रमातील मुले, दिव्यांग, जेएनयू व दिल्ली विद्यापीठातील मुस्लिम विद्यार्थी यांच्या हस्ते रोजची एक आरती आवर्जून केली जावी, असे देवधर यांचे प्रयत्न असतात. गणेशोत्सवात प्रत्येक पाहुण्याला एक पुस्तक भेट म्हणून दिले जाते.
‘पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत’ या पुस्तकाची प्रत यंदा त्यांनी सुमारे दोन हजार जणांना दिली आहे.
यंदा ज्या तृतीयपंथीयांना आरतीचा मान दिला गेला, त्यात सेवा भारतीच्या रेश्मा प्रसाद, सुमन सोरेन, सुजाता, सईदा यांचा सहभाग होता.
रेश्मा प्रसाद हे दिल्लीच्या एलजडीबीटीक्यू वर्तुळातील मोठे नाव आहे. राममनोहर लोहिया रुग्णालयात तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू व्हावी, यासाठी त्यांनी दीर्घ लढाई लढली होती.
आरती संपल्यावर देवधर मंत्रपुष्पांजली म्हणत असताना त्यांच्यासह इतर तृतीयपंथीयांना भावना अनावर झाल्या. इतके प्रेम, इतका सन्मान क्वचितच आमच्या वाट्याला येतो, असे प्रसाद यांनी सांगितले.