देशात पुन्हा लाॅकडाउन लागणार ? 10 दिवसांत कोरोना रुग्णसंख्या 257 वरून 3700 पार..

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 10 दिवसांत कोविड-19 च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, गेल्या 10 दिवसांत रुग्णसंख्या 257 वरून थेट 3700 पार गेली आहे. हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. जर हीच स्थिती राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा लाॅकडाउन लागणार का ? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, सध्या देशात कोविडचे 3758 अॅक्टिव्ह प्रकरणं आहेत. मागील 10 दिवसांत 1200 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. 22 मे 2025 रोजी देशात फक्त 257 सक्रिय प्रकरणं होती, जी 26 मेपर्यंत 1010 झाली.
गेल्या 24 तासांत 363 नवीन प्रकरणं समोर आली असून, दोन रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. दिल्लीसह देशातील इतर अनेक राज्यांमध्येही कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांत जास्त प्रकरणं समोर आली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच अधिक कडक उपाययोजना केल्या जाऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉल लागू करण्याची शक्यता आहे.
रविवारीपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 1400, महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीमध्ये 436 सक्रिय प्रकरणे आहेत. जगभरात वाढणाऱ्या कोविड संक्रमणामागे ओमिक्रॉन वेरिएंटचे नवीन प्रकार कारणीभूत आहेत. विशेषतः JN.1 वेरिएंटचे उपप्रकार LF.7 आणि NB1.8 हे सध्या अधिक पसरत आहेत.