डोहाळे जेवणानंतरचे शिल्लक अन्न, बासुंदी आश्रम शाळेतील मुलांना दिले
सांगली -170 विद्यार्थ्यांना विषबाधा

सांगली जिल्ह्यातील जत लातुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या उमदीच्या एका आश्रम शाळेत 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. या विद्यार्थ्यांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. मुलांनी हे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या सुरू झाल्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाल्यानंतर माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या येथे 79 विद्यार्थी सध्या उपचार घेत आहेत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. उर्वरित 90 रुग्णांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये आणि जत मधील रुग्णालयात पाठविण्यात आले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या आणि दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. येथे जवळपास 200 च्या आसपास मुले-मुली राहतात.
यातील जवळपास 170 विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा झाली. सदर विद्यार्थ्यांना त्रास सुरू होताच तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यातील जवळपास विद्यार्थ्यांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणि जत मधील काही रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
24 तासाच्या आत अहवाल
जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती घेत उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.