आगामी महापालिका निवडणूक – सावेडी उपनगर भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष अनिल मोहिते यांचा सत्कार..
अहिल्यानगर - भाजपा स्वबळावर लढणार..

शहराचा विकास हा आपल्याला मिळणार्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घडवावा लागेल – माजी नगरसेवक रामदास आंधळे
आजच्या या काळात जबाबदारीची व्याप्ती वाढली आहे. भाजपने ज्या मूल्यांवर आपली स्थापना केली आहे, त्याला कायम धरून ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली सेवा भावना वाढवून जनतेच्या दुःखांना समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे. शहराचा विकास हा आपल्याला मिळणार्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घडवावा लागेल. एकत्र येऊनच आपण सर्व आव्हाने पार करू शकतो, असे प्रतिपादन माजी नगरसवेक रामदास आंधळे यांनी केले.
उपनगर सावेडी येथे पारिजात चौकात भाजपच्या वतीने नवनिर्वाचित शहराध्यक्ष अनिल मोहिते यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी माजी नगरसेवक रामदास आंधळे, माजी नगरसेवक महेश तवले, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, अशोक गायकवाड, राजेंद्र आंधळे, बापू ठाणगे, पराग पाठक, सुजित खरमाळे, सोनवणे आकाश, प्रदीप घोडके, अभिजीत दरेकर, अभिजीत गायकवाड तसेच गुलमोहर रोड आणि पारिजात प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आंधळे म्हणाले की, शहरात स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगार यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनिल मोहिते यांच्यासारखे कार्यकर्ते हेच त्या जबाबदार्या पार पाडतील, अशी माझी खात्री आहे. भाजपच्या स्वबळावर शहराचा संपूर्ण विकास घडवून आणू या, असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना अनिल मोहिते म्हणाले, भाजपच्या अहिल्यानगर शहराध्यक्षपदी निवड झाल्याने अत्यंत अभिमान वाटतो आणि त्यासोबतच मोठी जबाबदारीही जाणवते. या पदावर उभा राहणे म्हणजे फक्त एक पद घेणे नाही, तर आपल्या शहराच्या लोकांच्या हितासाठी, विकासासाठी कठोर परिश्रम करण्याचा संकल्प आहे. माझा प्रयत्न राहील की, भाजपच्या ध्येय व धोरणांच्या अनुषंगाने अहिल्यानगरच्या प्रत्येक भागातील समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करून, जनतेच्या विकासासाठी पुढाकार घेणे.
पक्षाच्या मार्गदर्शनाखाली, सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि जनतेच्या सहवासाने आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास घडवू. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देऊन शहराला नवे आयाम देण्याचा माझा संकल्प आहे.
आपण सर्वांनी एकत्र येऊन अहिल्यानगरला सर्वोत्कृष्ट शहर बनवूया, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.