घरोघरी मातीच्या चुली असा सुंदर लेख हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली यांनी लिहिलाय..
डोंबिवली

आपल्या मनावर सतत चांगल्या विचारांचे संस्कार व्हायला हवे. अर्थात ते आपल्या आईवडिलांच्या संस्कारातून मिळालेलेच असतात.पण पुढे जगात वावरताना काही वेळेस आपल्या भावनांवर किंबहुना आपल्या षड्रिपूंवर ताबा न राहिल्यामुळे आपल्या हातून नकळत काही चुकीचे कर्म घडले जाते आणि ही गोष्ट ती घडून गेल्यानंतर कळते की अरे , मी चुकीचे केले.
आजकाल बहुतेक बरेच जण एखादा गुरू करतात, किंवा सत्संगला जातात. अतिशय चांगली गोष्ट आहे ही आपल्या मनाला सकारात्मकतेकडे वळवण्याचे कार्य हे गुरू किंवा सत्संग मध्ये केले जाते. शेवटी ज्याची जशी श्रद्धा तैसा नारायण. प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. माझा या सर्व गोष्टींवर अजीबात आक्षेप नाही उलट मला खूप आवडते या सर्व धार्मिक गोष्टींची . खंत कुठे वाटते तर तुम्हाला जे ज्ञान सत्संग मध्ये मिळते ते बरेच जण आचरणात आणत नाही. आज आपण सारे एक आहोत, कोणी लहान-मोठा नाही.
कुणी उच्च-नीच नाही असे सांगूनही एखादी सासू आपल्या मुलाने परजातीची सून आणली म्हणून कायम तिचा दुःस्वास करत राहील, तर कधी शेजाऱ्यांच्या घरात काय शिजतय हे सर्वांना कधी सांगते असे होणे, एखादी व्यक्ती स्वकर्तुत्वाने पुढे जाते तर तिच्याबद्दल मनात जलस निर्माण होणे ,सुनेला मुलगा न होता मुलगी झाली तर घराण्याला वंश नाही मिळाला म्हणून तिला जन्मभर कोसणे , अशा कितीतरी गोष्टी रोजच्या आयुष्यात घडतात पण स्वच्छ मनाने, मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकार करायला हवे .
हीच तर शिकवण मिळते ना आपल्याला या सत्संग मधून.अहो …..
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
लोक दुसऱ्यांना मोठ्या मनाने सांगतात की तुझी सून खूप गुणाची आहे पण घरी स्वतःच्या सुनेला चांगली वागणूक देत नाहीत. लोक फक्त एकमेकांना उपदेश देतात पण स्वतः तसे वागत नाही कारण एकच हो…घरोघरी मातीच्या चुली…दुसरे काही नाही.पण आता ही परिस्थिती बदलण काळाची गरज आहे आणि त्या साठी आधी स्वतः या गोष्टींचे आचरण केले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे अगदी आपल्या घरापासून याची सूरवात केली पाहिजे म्हणजे बघा किती आत्मिक आनंद मिळतो तुम्हाला.
आणि गमंत म्हणजे हा आनंद तुम्हाला कुठे बाहेर शोधण्याची गरज नाही तो तुमच्या मनातच असतो थोडे स्वतःला बदलून बघा आणि जीवनात आत्मिक आनंदाचा अनुभव घ्या…!