
पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्याच मित्रांवर विधान ठेवणं एका तरुणीच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच त्या विद्यार्थीनीचे अपहरण करून तिच्या घरी नऊ लाखांची खंडणी देण्याचा मेसेज केले. त्यानंतर चिंतातूर झालेल्या तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकरण समोर आले. त्या विद्यार्थिनीच्या मित्रांनीच तिचे अपहरण करुन खून केला होता. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.या प्रकरणी तिच्या तीन मित्रांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील विमान नगर परिसरातील फिनिक्स मॉलमधून बाहेर आल्यानंतर ती तरुणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या मित्रांसोबत गेली होती. शिवम हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. हे तिघे मराठवड्यातील आहेत. जाधव आणि इंदूरे हे शिवमचे मित्र आहेत.
त्यांनी भाग्यश्रीचा खून केल्याची कबुली दिली. ज्या दिवशी भाग्यश्रीचे अपहरण केले त्याच दिवशी तिचा खून केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुण्याजवळील सुपा येथे जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे त्यांनी कबुल केले.