कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केल? अजित पवारांसमोरच पंतप्रधान मोदींची जोरदार टीका
शिर्डी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजनांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केलं. महाराष्ट्रातले बडे नेते केंद्रात बराच काळ कृषीमंत्री होते, वैयक्तिकरित्या सन्मान करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ?’, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
‘त्यांच्या 7 वर्षात देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटींच्या एमएसपीवर अन्नधान्य विकत घेतलं. आमच्या सरकारने एवढ्याच काळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. 2014 आधी आधी डाळी आणि तेलबियांना 500-600 रुपये मिळायचे. आमच्या सरकारने 1 लाख 15 हजार कोटी रुपये डाळी आणि तेलबियांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले.
ते कृषीमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना अडत्यांच्या भरवशावर राहायला लागत होतं. महिनोंमहिने शेतकऱ्यांना पैसे मिळायचे नाहीत, आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता केली.