
पुण्यातील रास्ता पेठ भागात ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आज सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास आग लागली होती.
पहिल्या मजल्यावरील खोलीत लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पुर्ण जळाल्याची माहिती आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालय व कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तळमजला अधिक तीन मजले असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक चारमध्ये आग लागली आहे.
जवानांनी प्रथम विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का व कोणीही आतमध्ये नाही याची खात्री केली. या खोलीत राहत असलेल्या तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी सदर खोलीत आगीवर पाणी मारुन ती इतरत्र पसरु न देता सुमारे १० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले व नंतर आग पूर्णपणे विझवली.
या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या होत्या. आग खोलीमध्ये असणाऱ्या हिटरमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आग लागल्याचे समजताच रुग्णालयात असणाऱ्या कर्मचारयांनी तेथे उपलब्ध असणारे अंदाजे १८ अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक सचिन चव्हाण, समीर शेख व तांडेल सुनिल नामे, संजय गायकवाड आणि जवान भुषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख यांनी सहभाग घेतला.