
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शहरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसह केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. समाजाचे मार्गदर्शक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसाला आशीर्वाद लाभले, हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, उद्योजक पंकज ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंबपद्धती लयास चालली आहे. आई-वडील आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण, प्रेम, माया देतात. समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात.
परंतु, याच आई- वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अत्यंत कमी आहे. शिक्षण घेऊन आपला, आपल्या बुद्धीचा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु, उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालेले काहीजण आई-वडिलांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.