माझ्या आठवणीतील माझे आजोळ – प्रियंका मांगले यांच्या शी दिलखुलास गप्पा
अहमदनगर

मी सौ. प्रियंका मांगले. राहणार – अहमदनगर.
बारामती जवळील वालचंदनगर माझ सासर. खुप दिवस गेले नव्हते त्यामुळे आज निघाले होते. लवकर निघायच म्हणत म्हणत सकाळी ८.३० वाजता निघाले. नवरोबांनी गाडी स्टार्ट केली व गाडीवर स्वार होऊन आम्ही अगोदर स्टँड गाठल . अजून ५ मिनीट लेट झाला असता तर ही गाडी निघून गेली असती .गाडीचा बोर्ड पहिला तर खूप काही आठवणी जाग्या झाल्या.
छत्रपती संभाजीनगर ते निपाणी असा बोर्ड होता तो . निपाणीहून अवघ्या अर्धा ते पाऊण तासात येणारं माझं आजोळ नवलिहाळ.
निपाणी मधील केळी आजही मला आवडतात . अबोली, मोगरा या फुलांचा गजरा आजही मला आवडतो .त्याची आवड बहुतेक इथूनच चालू झाली असावी.आई दरवेळी आजीकडे जाताना गजरा घेवून द्यायची .गावी येतोय असा फोन केला की मामा निपाणी मध्ये गाडीच्या अगोदरच स्टँड वरती हजर असायचा . निपाणी वरून बस गावाच्या दिशेने पळू लागली की आजीकडे गेल्यावर हे करेन ,आजीला हे सांगेन ,ते सांगेन ,अशी गंमत करू सगळे मिळून ,तशी गंमत करू याच नियोजन करत करत त्या धावत्या बस बरोबर मन ही धावत सुटायच.
बस नवलिहाळ स्टॉप वर बस पोहचते न पोहचते तोवर नजर आजोबांना शोधायची . बस स्टॉप पासून घर तस १५ – २० मिनिटाच्या अंतरावर असे.आजोबा सायकल घेवून उन्हातन्हात आमची वाट बघत बसलेले असायचे. सायकल वर बॅग टाकून सगळ्यात छोट्या भावंडाला स्वार केलं जायचं. मग आम्ही गप्पा गोष्टी करत घरी चालत यायचो.त्यांच्या डोळ्यात नातवंडं भेटल्याचा आनंद दिसायचा तर आम्हाल आजोबा , आजी , आमची बाकीची भावंडं भेटलेला आनंद असायचा.
नवलिहाळ गावच्या किती त्या आठवणी .लहानपणी सगळी भावंडं दिवाळी , मे महिन्याची सुट्टी एकत्र एन्जॉय करायचो . आजी , मामा कळून लाड पुरवून घ्यायचो. तेव्हा मोबाईल कोणाकडे नव्हते. गरजही तशी वाटायची नाही फार तेव्हा खूप बोलण व्हायच,भांडण सुद्धा व्हायची आम्हा सगळ्या भावंडांची , भरपूर खेळायचो ,कन्नड पिक्चर समजत नव्हते तरीही बघायचो,गावामध्ये पहिल्यापासूनच तिथल्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची ,विहिरीवर दोर टाकून पाणी ओढाव लागायच, ते वापरत असत अंघोळीसाठी,भांडी धुण्यासाठी ,कपडे विहिरीवरच धुवून आणत असत.
तिथल्या बायकांची पाणी ओढण्यासाठी ,कपडे धुण्याच्या जागेसाठी करावी लागणारी भांडण बघून आम्ही मात्र त्याचा आनंद घ्यायचो . पिण्याच्या पाण्यासाठी सायकल वरून दुरून पाणी आणावं लागायच. आम्ही मात्र जाईल तेव्हा पाणी आणायचो , विहिरीवर दोर टाकून पाणी काढायचो ,सायकल वर घागरी बांधून पिण्याच्या पाण्याची सोय करायचो.खूप मजा यायची तेव्हा .
मे महिन्यात आंबे खाण्यासाठी आम्ही सगळे तुटून पडत असत.मामी,आजी ,आई,मावशी यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद घेत असत.दर सोमवारी तिथे असलेल्या बसवेश्वर मंदिरात जाण्याचा आमचा ठरलेला उपक्रम .जाताना सुद्धा घरून खावूचा डब्बा सोबत असायचा .घराच्या पाठीमागे लागलेल्या सीताफळाच्या झाडाला सीताफळ खायला तयार झाले का ? याकडे आम्हा सगळ्या भावंडांच लक्ष असायचं.दर मंगळवारी भरलेल्या बाजारातून गोल गोल बिस्कीट,चिरमुरे आणले रे आणले की आम्ही सगळे त्यावर ताव मारत असायचो.संध्याकाळी जेवण झाले की गप्पा मारत सगळे अंगणात बसायचो .
जैन मंदिरात सकाळी लवकर जावून दर्शन घ्यायचो ,येताना वाटेत हनुमान मंदिर,दत्त मंदिर सगळ्या देवांना नमस्कार करून यायचो.काही भावंडं दूध आणायला डेरी कडे निघायची,तर काही टोपीवाले आजोबा होते त्यांच्या कडे चहा सोबत खाण्यासाठी पाव आणायला पळायचे. तिथल्या शंकर काकांनी बनवलेली भजीची चव आजही तशीच जिभेवर रेंगाळते आहे.आजोबा,मामा,आजी आम्हा सगळ्या भावंडांसाठी भजी घेवून यायचे. आजी ,आजोबा बांगडी व्यवसाय करायचे यांच्यासोबत आम्हीही लग्न कार्यात नववधूला त्याच्या घरातील महिला वर्गाला बांगड्या घालण्यासाठी जायचो. नाही जमल तर कोणी किती घातल्या याचा हिशेब लिहायला जायचो. कोणी आजारी पडलच तर ठरलेले डॉक्टर मामा म्हणून राम मामा कडे आमची रवानगी असायची .
आजोबांचे भाऊ ज्यांना आम्ही काका आजोबा म्हणायचो ,त्यांना आम्ही सगळे भेटायला जायचो तेव्हा काकू आजींनी केलेला छान छान खावू मिळायचा. काका आजोबांना वाचनाची आवड प्रचंड होती त्यामुळे वेगवेगळी पुस्तक वाचायला मिळायची .माझ्याही आजोबांना वाचनाची प्रचंड आवड,सगळ्या व्याप सांभाळून ते स्वतःची आवड जपत असत. दोन्हीही मामांची मूल,आम्ही भावंडं ,मावशीची मूल अशी सगळी मिळून १० भावंडं असायचो.आजीच्या हातचा हिंगणमीट्टा हा पदार्थ खायला आम्हा भावंडांची भांडण असायची .
आजही तिच्या या पदार्थाची चव आहे तशी आहे.आम्ही गेलो की सगळे जण आजी,आजोबांना म्हणायचे ,बघा तुमचं घर कसं गोकुळ झालंय,तेही खुश असायचे.परिस्तिथी कशी अशी बालपण तेव्हा श्रीमंत होते.सुटीचे दिवस संपत आले ,सगळे आपल्या आपल्या घरी चालेले की मग वाईट वाटायंच.परत आपण सहा महिन्यानंतर भेटणार ,काही बोलण असेल तर फोनवरच या मुळे दुःख व्ह्यायच.मामाच्या मुलग्याला रडताना पाहिले की मग मात्र आम्हा सगळ्यांचा अश्रूंचा बांध फुटायचा .एकमेकांचा निरोप घेत आम्ही सगळे आपल्या आपल्या घरी जायचो.आजी दरवेळी जाताना वाटेत खाण्यासाठी दशमी,पिठलं,दहीभात करून द्यायची .आजही देते .आजही तिची इच्छाशक्ती प्रचंड आहे .या वया मध्ये ती करत असलेलं काम बघून आपण थक्क होतो .
बालपण सरत सरत गेले.आज आम्ही सगळे मोठे झालो.आज प्रत्येक जण नोकरी, करीअर ,संसार या मध्ये व्यस्त झालो . आजही ते घर आमची वाट बघत आहे की सगळ्या मुलांनी यावं व या शांत झालेल्या भिंती आवाजांनी, आनंदानी, हास्यांनी उजळून निघाव्या.आजी च्या वयामाना प्रमाणे तिला कमी ऐकू येत असेलही पण नातवंडांनी मारलेली हाक तिला आजही स्पष्ट ऐकू येते.किती ते प्रेम ,आपुलकी,आहे त्या परिस्तिथी राहण्याची समाधानी वृत्ती, कष्ट करण्याची तयारी,किती गोष्टी तिच्याकडून शिकाव्या तितक्या कमी.आजोळ च प्रेम भरभरून मिळालं . मामा,मामी,आजी ,आजोबा ,सगळी भावंडं यांनी खूप प्रेम,जिव्हाळा,आपुलकी दिली ,जी आज कुठे मिळणार नाही.कितीही पैसा आला तरी या प्रेमाची ऊब कुठे मिळणार नाही. आजोळ ची ओढ आजही तशीच टिकून आहे व ती अशीच राहणार .तेव्हा परिस्थिती कशीही असो बालपण श्रीमंत होत. या सगळ्या आजोळीच्या गोड आठवणी जपत आयुष्याची पुढील वाटचाल करायची आहे ,आनंद घ्यायचा आहे.
माझी आजी जिने लहानपणापासून आम्हाला प्रेम, जिव्हाळा , आपुलकी, माणुसकी शिकवली . छोट्या छोट्या संकटाना घाबरायच नाही हे तिने आम्हाला शिकवलं .
कंडक्टर काकांनी बारामती म्हणून बेल वाजवली व माझ्या विचारांची तंद्री कुठेतरी थांबली .डोळ्यात आजोळीच्या आठवणींनीनी आलेले अश्रू पुसत मी बस मधून उतरण्यासाठी उठले.
तेव्हा पाठीमागे बसलेल्या छोट्या बाळाच्या हातात असलेल्या मोबाईल वरील बालगीत ऐकू आलं. झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत सोडी,पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जावूया ,जावूया मामाच्या गावाला जावूया .
असे होते माझ्या आठवणीतले आजोळ..
लेखन – स्वलिखित – प्रियंका मांगले