मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आज मुंबईत आंदोलन
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या घरावर काळे झेंडे लावण्याचा इशारा

राज्यातील पहिल्या मराठा क्रांती मूक मोर्चाला आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईत आझाद मैदान व मंत्रालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी छत्रपती संभाजीनगरहून अनेक कार्यकर्ते कालच मुंबईला रवाना झाले आहेत. तसेच, या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास व आरक्षणाबाबत तातडीने ठोस भूमिका न घेतल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर काळे झेंडे लावण्याचा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने 9 ऑगस्ट 2016 रोजी छत्रपती संभाजीनगरात पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा काढून आवाज उठवला होता. याबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश पाटील यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षांत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मात्र, सरकारने केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीही केले नाही.
रमेश पाटील म्हणाले, आरक्षणासह मराठा समाजाच्या इतर मागण्यासंदर्भात शासनाने समिती स्थापन केली आहे. त्यानंतर मागण्यांबाबत फक्त आणि फक्त गाजर दाखवले जात आहे. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड रोष आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी मराठा समाज आज 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी आझाद मैदान आणि मंत्रालयावर दाखल होत आहे.