आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन..

पावसाचं आगमन झालं की चाहूल लागते ती आषाढी वारीची, ओढ लागते पंढरीच्या पांडुरंगाची. अनेक वारकरी या कालावधीत याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असतात. पंढरीच्या विठुरायाला भेटायला जाण्यासाठी महिनाभर आधीच तयारी करतात. या वारकऱ्यांच्या आनंदात मध्य रेल्वेने देखील भर घातली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. भुसावळ-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या मार्गांवर एकूण १६ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे खान्देशातील तसेच विदर्भातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ-पंढरपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी १.३० वाजता सुटून पंढरपूरकडे रवाना होईल. तर गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी पंढरपूर येथून रात्री १०.३० वाजता सुटणार आहे.
या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
याशिवाय नागपूर-मिरज विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०१२०५ ही २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१११९ ही २१ व २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवी अमरावतीहून सुटेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ व २५ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून रवाना होईल.
खामगाव-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११२१ ही २१ व २३ जुलै रोजी खामगावहून सकाळी ११.३० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०११२२ ही २२ व २४ जुलै रोजी पंढरपूरहून पहाटे ५ वाजता सुटणार आहे.
आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे रवाना होत असल्याने या विशेष रेल्वे सेवा प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार असून गर्दीचे नियोजन करण्यासही मदत होणार आहे.




