ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मनपा उपमहापौर धनंजय जाधव ॲक्शन मोडवर

अहिल्यानगर

मनपा उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव यांची अचानक तपासणी.उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक इशारा. वेळेचे भान ठेवण्याच्या सूचना.“नगरकरांची सेवा हीच आपली जबाबदारी” – उपमहापौरांचा स्पष्ट संदेश..

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी सकाळी १० वाजता अचानक भेट देत गेटवर उभे राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. अचानक झालेल्या या तपासणीमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट जाब विचारत पुन्हा उशीर झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. महापालिकेच्या कामकाजात शिस्त राखणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी अ‍ॅड. धनंजय जाधव म्हणाले की, “महापालिका ही केवळ नोकरी करण्याचे ठिकाण नाही, तर ती नागरिकांच्या सेवेसाठी असलेली जबाबदारी आहे. प्रत्येक कर्मचारी हा या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. आपण वेळेवर कामावर आलो नाही, तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या कामांवर होतो. त्यामुळे कामावर एक-दोन तास उशिरा येणे ही गंभीर बाब आहे.

ते पुढे म्हणाले, “सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा या वेळेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित उपस्थित राहून आपले काम प्रामाणिकपणे पार पाडावे. नागरिकांना त्यांच्या कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वेळेचे भान ठेवून जबाबदारीने काम केल्यास महापालिकेची प्रतिमा उंचावेल.

“महापालिकेबद्दल आपले कर्तव्य ओळखा. नागरिकांना चांगली, जलद आणि पारदर्शक सेवा देणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. यापुढे कोणताही कर्मचारी विनाकारण उशिरा येताना आढळल्यास त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल,” असा कडक इशाराही त्यांनी दिला..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे