अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कॅन्सर मोबाईल व्हॅन जनजागृती शिबिराचे उद्घाटन संपन्न
अहिल्यानगर

देशात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर कॅन्सर रोखण्यासाठी समाजामध्ये व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असून यासाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योतीताई गाडे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कॅन्सर मोबाईल व्हॅन जनजागृती शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, महिला व बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक महेश लोंढे, संदीप दातरंगे, रोहन सानप, अभिजीत बोरुडे तसेच डॉ. दिलीप बागल, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. साहिल शेख, योगेश औटी, विकास गीते आदींसह अधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर गाडे यांनी सांगितले की, व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून आजाराचे लवकर निदान व उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये कॅन्सर मोबाईल व्हॅनद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी सांगितले की, महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू असून शासनाच्या विविध योजना थेट रुग्णांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. कॅन्सर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होऊन आजाराचे तातडीने निदान व उपचार होणे शक्य होईल.
आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, या जनजागृती शिबिरामध्ये ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, तसेच ३० वर्षांवरील स्त्री-पुरुषांसाठी मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे.
याशिवाय क्षयरोग मोहिमेअंतर्गत छातीचा एक्स-रेसह विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कर्करोग टाळण्यासाठी व्यसनमुक्ती अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.



