
अहिल्यानगर जिल्ह्यात गॅसच्या वाढत्या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेल व खाद्यपदार्थ व्यवसायावर दिसू लागला आहे. हातगाडीवर मिळणारा साधा वडापाव आता २० रुपयांपर्यंत पोहोचला असून एक कप चहा देखील १५ ते २० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. दरवाढीमुळे कामगार, विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराण-अमेरिका-इस्त्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हॉटेल, टपऱ्या आणि हातगाडी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. गॅसची उपलब्धता कमी झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांना पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे ते सांगत आहेत.
गॅस टंचाईचा परिणाम मेन्यूवरही दिसू लागला आहे. भजी, ऑम्लेट, अंडी भुर्जी यांसारखे पदार्थ आधीपेक्षा महाग झाले असून काही ठिकाणी ते मर्यादित प्रमाणातच उपलब्ध आहेत.
अनेक हॉटेलमध्ये गॅसअभावी चुली किंवा शेगड्यांचा वापर करून जेवण तयार केले जात आहे.




