उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.
कामकाजाची सर्व सुत्रे हातामध्ये घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवर भावुक पोस्ट शेअर केली. ‘दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न मी करेन.’, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे.
अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
तसंच, ‘दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन.
या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.’, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांनी ज्यापद्धतीने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी कामं केली तशीच कामं मी देखील करेन असा विश्वास राज्यातील जनतेला दिला.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सुनेत्रा पवार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील अजित पवार यांच्या दालनात गेल्या.
या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे भावुक झाले. सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या खुर्चीवर बसून पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते आणि आमदार देखील उपस्थित होते.




