‘बाल दुकानदार’ देणार पूरग्रस्तांना मदत.परिवर्तन प्रतिष्ठानच्या पुढाकारातून रविवारी उपक्रम
अहिल्यानगर

विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार चातुर्य, विक्री कौशल्य वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने दिवाळीच्या निमित्त परिवर्तन प्रतिष्ठानच्या पुढाकारातून ‘चला दुकानदार होऊ या’ हा उपक्रम रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) रोजी सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात होणार आहे.
यंदाच्या हा उपक्रम पूरग्रस्तांसाठी समर्पित केला जाणार आहे, बाल दुकानदारांना झालेला नफा पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला जाणार आहे..
गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रमराबविला जातो. त्यासाठी परिवर्तन प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रयत्नशील असतात. या उपक्रमाला नगर शहरातील विद्यार्थ्यांकडून वाढत्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. याही वर्षी संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले असून पाचवी ते नववीतील विविद्यार्थ्यांना वस्तु, पदार्थ विक्रीचा आणि त्यातून स्वकमाईचा आनंद घेता येणार आहे.
कोहिनूर मंगल कार्यालयात होणारा हा उपक्रम संध्याकाळी ४ ते ८ या वेळात आयोजित केला आहे. या उपक्रमाला भेट देण्यासाठी तसेच बाल दुकानदारांना शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक किशोर थत्ते, गिरीश मुळे, प्रसिद्ध व्यावसायिक बालाजी डेअरीचे लक्ष्मीकांत चिकटे, जाहिरात तज्ज्ञ ज्ञानेश शिंदे, विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष अरुण कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
यंदा अतिवृष्टी झाल्याने लाखो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे त्यांचा दिवाळीचा उत्साह पुरता मावळला असल्याने त्यांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे परिवर्तन प्रतिष्ठानने ठरवले आहे. उपक्रमातील बाल दुकानदारांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना स्वकमाईचा आनंद देण्यासाठी जास्तीत जास्त नगरकरांनी या बाल दुकानदारांकडून खरेदी करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन परिवर्तन प्रतिष्ठानने केले आहे.




