लाडक्या बाप्पाचे उद्या आगमन, जाणून घ्या मंगलमूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
अहिल्यानगर

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस असल्याने हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. यंदाचा गणेशोत्सव अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे.
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीची तिथी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 वाजता सुरू होईल आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:44 वाजता संपेल. त्यानुसार, यंदाचा गणेशोत्सव 27 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. हा दिवस देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, गणपतीच्या पूजेसाठी मध्यान्ह काळ सर्वात शुभ मानला जातो. यंदा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 हा मध्यान्ह गणेश पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे.
असे मानले जाते की या शुभ वेळेत गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून पूजा केल्यास घरात सुख, शांतता आणि समृद्धी येते. त्यामुळे या शुभ मुहूर्तावरच बाप्पाची स्थापना करावी.




