सिंदूर–एक स्त्री च्या अस्तित्वाचे प्रतीक. लेखिका मनीषा लहारे यांनी खुपच सुंदर पध्दतीने या लेखातून व्यक्त केलेय. नक्कीच शेवट पर्यंत वाचा..
अहिल्यानगर

‘सिंदूर’ हा शब्द फक्त तीन अक्षरांनी बनलेला असला तरी एका भारतीय स्त्रीच्या निम्म्यापेक्षा अधिक आयुष्याचा तो एक भावनिक अविभाज्य घटक असून तो एका भारतीय स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याशी घट्ट जोडलेला असतो. हे पवित्र नातं आहे सात जन्मांचे. कारण ‘सिंदूर’ हा शब्द म्हणजे फक्त लाल रंग नाही तर तो स्त्रियांच्या केसांच्या भांगात भरणारे सुहागाचे प्रतीक मानले जाते .
हा फक्त लाल रंगाचा एक लावण्यपूर्ण टिळा नसून तो एक भावनिकतेचे, धार्मिकतेचे, संस्कृतीचे आणि सामाजिकतेचे प्रतीक आहे. भारतीय स्त्रीसाठी सिंदूर हे तिच्या वैवाहिक आयुष्याचे, निष्ठेचे, प्रेमाचे, आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. केसांच्या भांगात भरलेला हा सिंदूर स्त्रीच्या मनामध्ये एका नव्या जबाबदारीची जाणीव निर्माण करत असते. जसे एक उत्तम पत्नी, सून, नणंद, काकी, जाऊबाई, आई, सासू, आजी आणि समाजातील एक आदर्श स्त्री म्हणून घरात व समाजात वावरत असते.
हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक शुभकार्यात कुंकवाचा वापर केला जातो. विवाहित महिलेच्या आयुष्यातील कुंकवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिने कपाळावर लावलेले कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळख असते म्हणून त्याला सौभाग्याचं लेणं मानलं जातं. सौभाग्याचे म्हणजेच पतीचे आयुष्य दीर्घाऊ रहावे, यासाठी महिला कपाळावर कुंकू लावत असतात.
विवाहित स्त्रीच्या माथ्यावर लावलेले चिमूटभर कुंकू तिच्या जीवनातील सुख समृद्धीचा परिचय करून देते. पतीच्या नावाने लावलेले कुंकू तिचे अखंड विवाहित असण्याची निशाणी दर्शवते. एका विवाहित स्त्रीसाठी सर्व सोळा शृंगारामधून कुंकू अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक महिला कपाळभर कुंकू लावतात. मात्र आता या कुंकवाची जागा टिकलीने घेतली असली तरीही त्याचे महत्त्व कायम आहे. सण, उत्सव घरगुती कार्यक्रमात अजूनही कुंकवाचाच वापर केला जातो.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हे केवळ दोन व्यक्तींमधील करार नसून तो दोन आत्म्यांचं, दोन कुटुंबांचं आणि दोन आयुष्यांचं पवित्र एकत्रीकरण मानलं जातं. या एकत्रीकरणामध्ये सिंदूर हा एक महत्त्वाचा घटक असतो. लग्नाच्या मंगलविधीमध्ये वर जेव्हा वधूच्या भांगात सिंदूर भरतो, तेव्हा तो क्षण केवळ धार्मिक नसून आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्याही अत्यंत पवित्र असतो. तो क्षण स्त्रीच्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू करतो, जिथे तिचे अस्तित्व एका नवीन नात्याशी जोडलं जातं.
भारतीय स्त्रीसाठी पती हा केवळ एक जीवनसाथी नाही, तर तो तिच्या जीवनात स्थिरता, सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठा देत असतो. एका मुलीला प्रथम वडिलांचे नाव मिळत असते आणि लग्नानंतर तिला तिच्या पतीच्या नावावरूनच पुढे आयुष्यभर स्त्री म्हणून नवीन ओळख मिळत असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये पतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
भारतीय संस्कृतीत पती-पत्नीचे नाते हे केवळ शारीरिक नसून आध्यात्मिक, भावनिक आणि सामाजिक ही महत्त्वाचे मानले जाते. पत्नी आपल्या पती सोबत मिळून कुटुंब व्यवस्था संभाळत असते, ज्यामुळे कुटुंबाला स्थिरता आणि आधार मिळत असतो. पत्नी ही फक्त एक सहचारीणी नसून ती पतीच्या सुख-दुःखात सहभागी होणारी, त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेणारी आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहणारी एक जीवनसाथी असते. स्त्री आपल्या पतीसाठी केवळ प्रेमानेच नव्हे, तर श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पणाने सिंदूर स्विकारत असते. सिंदूर हे तिच्या सौभाग्याचे चिन्ह आहे, त्यामुळेच विधवा झाल्यानंतर सिंदूर न लावण्याची परंपरा आजही काही समाजात पाळली जाते, कारण तिच्या आयुष्यातील तो भाग संपलेला असतो.
आजही ग्रामीण भागात आणि शहरी भागात अनेक स्त्रिया सिंदूर लावण्यास एक गौरव मानतात कारण तो तिच्या सन्मानाचे आणि अस्मितेचे चिन्ह बनलेले असते. लग्नानंतर एका स्त्रीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलतात जसे नाव, घर, जबाबदाऱ्या, मातृत्त्व, स्वप्नं पण त्या सर्व बदलांसोबत ती सिंदूरालाही आपल्या अस्तित्वाचा भाग मानते.
असा हा लाल रंग आहे सिंदूराचा. भारतीय स्त्रीच्या आयुष्यात लाल रंग फक्त रंग म्हणून किंवा एक सौंदर्य प्रसाधन नसून तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा एक अभिन्न घटक बनतो. लाल रंग आहे तिच्या स्वाभिमानाचा, तिच्या नात्याच्या बंधनाचा आणि तिच्या अंत:करणातील निखळ समर्पणाचा. चैत्रगौरी, वटपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौरी, सत्यनारायण, हरितालिका, ज्येष्ठ गौरी पूजन, नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी लक्ष्मीपूजन, मार्गशीर्ष गुरुवार व्रत, मकरसंक्रांत हे आणि असे अनेक स्त्रियांचे वर्षभरातील हळदीकुंकूचे महत्त्वाचे सण आहेत.
लाल रंग अत्यंत प्रभावी आणि लक्ष वेधून घेणारा असतो. लाल रंग हा फक्त रंग नाही, तर तो भारतीय परंपरेचा, श्रद्धेचा, नवसाच्या पूर्णत्वाचा आणि भावनांचा रंग आहे. देवतेच्या चरणी अर्पण करण्यात येणारा गुलाल असो किंवा व्रताच्या निमित्ताने कपाळावर लावलेला टिळा असो, वा नववधूच्या कपाळातील सिंदूर असो ! लाल रंगाची प्रतीके स्त्रीच्या सशक्ततेचे आणि सौभाग्याचे द्योतक असतात. लाल रंगाला सौभाग्याचा, प्रेमचा, वचनबद्धतेचा, शक्तीचा, नवीन ऊर्जेचा, समर्पणाचा, शौर्याचा, समृद्धीचा, सातत्याचा आणि उत्साहाचा यांचे प्रतीक मानले जाते. लाल रंग तीव्र भावना आणि आवेशाचे प्रतिनिधित्व करत असून हा रंग प्रत्येक भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील एक अनिवार्य भाग आहे.
आपल्या भारत देशाचा इतिहास पाहिला तर आपल्याला दिसते की प्राचीन काळात देखील सिंदूर लावण्याची परंपरा होती. राजा-महाराजांच्या काळात स्त्रिया सिंदूराला अत्यंत महत्व द्यायच्या कारण तो तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौख्यासाठी आणि सौभाग्यासाठी लावला जात असे. सिंदूर लावणं म्हणजे केवळ परंपरा पाळणं नाही, तर आपल्या नात्यांची जबाबदारीही स्विकारणं असतं.
पहलगाममध्ये गमावलेल्या निष्पाप जीवांसाठी न्यायाचे प्रतीकात्मक रूप म्हणून या ऑपरेशनला ‘सिंदूर’ असे नाव देऊन भारत सरकारने इतर देशांना एक मजबूत संदेश देण्याचा मानस केला. हा पहलगाममध्ये गमावलेल्या निष्पाप हिंदू जीवांसाठी न्यायाचे प्रतीकात्मक रूप होते आणि याला प्रामाणिकपणे साथ दिली ती आपल्या भारतमातेच्या वीर जवानांनी.
आपल्या भारत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानांनी स्वतःच्या परिवाराचे ‘सिंदूर’ पणाला लावून हे ‘सिंदूर ऑपरेशन’ मोठ्या धैर्याने व मातृभूमीच्या प्रेमापोटी आपल्या प्राणाची पर्वा न करता मोठ्या मनाने पूर्णत्वास नेले आहे. ‘सिंदूर’ हे नाव संरक्षण, सन्मान आणि पीडितांना श्रद्धांजली वाहण्याचे प्रतिनिधित्व करते. हे भारताच्या नागरिकांचे आणि मूल्यांचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे देखील प्रतिबिंबित करते.
“मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पैशाच्या बाबतीत नाही तर कोट्यवधी माता, बहिणी आणि मुलींचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ताकद, भांडवल आणि संरक्षणात्मक ढाल आहेत,” असे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा. मोदीजी म्हणतात. त्यांनी अशाप्रकारे आपली सर्व विधाने सत्यात उतरवली आहे. या पावन भारत भूमीवर राहणाऱ्या सर्व जनतेला ते आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेमाने जपतात हे आपल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ या मधून दिसून येते.
असा हा लाल रंग भारतीय संस्कृतची आन-बान-शान म्हणजेच आत्म-सम्मान, वेशभूषा आणि प्रतिष्ठापूर्ण ओळख आहे. असा हा लाल रंग अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनातील विविध पैलूंसोबत सदैव जोडलेला असतो. असा आहे हा ‘सिंदूर’..