
टोमॅटोचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम जेवणाच्या थाळीवरही झाला आहे. नुकत्याच रेटिंग एजन्सी क्रिसिल च्या अहवालानुसार, शाकाहारी थाळी २८ टक्क्यांनी महागली आहे. टोमॅटोने सर्वसामान्यांची चिंता वाढवली असतानाच इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत.
त्यात आता या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाऊस आणि पुराचा परिणाम आता कांद्यावरही होऊ लागला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठ्यात ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळेच येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत.
सध्या कांदा ३० रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. मात्र, व्यापारी ज्या प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत, त्यावरून भविष्यात कांदा ४० ते ५० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, कांद्याचे भाव आता काही काळ स्थिर आहेत. परंतु, येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढू शकतात. पावसामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा हळूहळू कमी झाला आहे. याचाच अर्थ पूर आणि पावसाचा कांद्यावर परिणाम झाला आहे. तर, ज्या कांद्याचा साठा करून ठेवलेला आहे. तो आता हळूहळू बाहेर पडू लागेल, त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार आहेत.
त्यामुळेच सध्या बाजारात २० आणि २२ रुपये किलोने उपलब्ध असलेला आणि किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने उपलब्ध असलेला कांदा येत्या काही दिवसांत ४० ते ५० रुपये प्रतिकिलो होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
त्यामुळे व्यापाऱ्यां बरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.