पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न..गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एकवटल्या महिला ..
अहिल्यानगर

बोर्डाच्या परीक्षेवर भवितव्य ठरत नसून, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते – रोहित रामदिन..
फक्त बोर्डाच्या परीक्षेवर भवितव्य ठरत नाही, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. नियोजन व प्रयत्न केल्याशिवाय जीवनात यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य, आत्मविश्वास, नियमितपणा व ध्येयपूर्तीची जिद्द ठेवून अतिउच्च शिखर गाठू शकता, असे प्रतिपादन सायन्स अकॅडमीचे संचालक रोहित रामदिन यांनी केले.
पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील हॉटेल रेडियन्स येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रामदिन बोलत होते.
याप्रसंगी शहर बँकेचे संचालक दत्तात्रय रासकोंडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंडला, पद्मशाली स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ आदींसह पदाधिकारी महिला, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंडला यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर केल्यास काम करण्यास उत्साह निर्माण होवून समाधान मिळते. पोलीस खाते एक कठीण करियर आहे. पण त्याद्वारे लोकांची सेवा करण्याचे समाधान मिळते. आवडीच्या क्षेत्रात उच्च पदावर जाण्याचा निश्चय करा. पोलीस खात्यात येण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
दत्तात्रय रासकोंडा यांनी महिलांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांचा होणारा सन्मान त्यांच्या भावी वाटचालीसाठी स्फूर्ती देणारा असल्याचे सांगून, पद्मशाली स्नेहिता संघमच्या माध्यमातून महिलांचे सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात डॉ. रत्ना बल्लाळ यांनी मागील 24 वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये कधीही खंड पडलेला नसल्याचे स्पष्ट करुन महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
पाहुण्यांचा परिचय सपना छिंदम, रोहिणी पागा, पूनम वन्नम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना कोल्पेक यांनी केले. आभार सविता कोटा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता एक्कलदेवी, सीमा अंकाराम, आरती छिंदम, सुवर्णा पुलगम, सोनी लयचेट्टी, विजया धारा, विजया गुंडू, रेखा गुरुड, सुमन श्रीगादी, कविता भारताल, प्रमिला चिलका, सीए सुनंदा रच्चा, कांचन कुंटला यांनी परिश्रम घेतले.