पत्नीचा दुसरा विवाह होऊन पंधराच दिवस, सासऱ्यावर पहिल्या पतीने केला गोळीबार
अहमदनगर

घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाहाला पंधरा दिवस झाले नाही, तोच तिच्या सासरी जाऊन एकाने गोळीबार केला. त्यात तिचा सासरा गंभीर जखमी झाला. तालुक्यातील हत्राळ येथे बुधवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
अहमदनगर जिल्हा तसा पुरोगामी. परंतु अलीकडील काळात अनेक गुन्हेगारी घटनांनी याला काळिमा फासण्याचे कृत्य केले. आता अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीये. एका महिलेच्या सासऱ्यावर पहिल्या पतीने गोळीबार केल्याची घटना समोर आलीये.
घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाहाला पंधरा दिवस झाले नाही, तोच तिच्या सासरी जाऊन एकाने गोळीबार केला. त्यात तिचा सासरा गंभीर जखमी झाला. तालुक्यातील हत्राळ येथे बुधवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
माणिक सुखदेव केदार (वय ५५) असे जखमीचे नाव असून, आरोपी सुभाष विष्णू बडे (वय ३०, रा. येळी, पाथर्डी) याला रहिवाशांनीच पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत समजलेली माहिती अशी पाथर्डीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या हत्राळ येथे माणिक सुखदेव केदार (वय ५५) व त्यांचे कुटुंबीय केदार वस्तीवर राहतात.
ते रात्री आठच्या सुमारास जेवण करत असताना सुभाष विष्णू बड़े तेथे आला व त्याने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी केदार यांच्या डाव्याबरगडीच्या वर लागली. त्यामुळे केदार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळी शरीरातच असल्याने त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सचिन लिमकर, अमोल आव्हाड, सुहास गायकवाड, संदीप बडे यांच्यासह पोलिस पथक हत्राळ गावात दाखल झाले. आरोपी बडे याला गावातील ग्रामस्थांनी चोप देऊन बांधून ठेवले होते.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पाथर्डी पोलिस टाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मारहाण झाल्याने आरोपी सुभाष बडे जखमी झाल्याचे समजते. त्याच्याकडे पिस्तूल कोठून आले, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.