मेथी ५० पैसे, कोथांबीर १ रुपया भाव नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकत प्रजासत्ताकदिनीच शेतकऱ्याचा आक्रोश
अहमदनगर

शेतकऱ्याचे आर्थिक गणित काही केल्या जुळत नाहीये. अस्मानी सुलतानी संकटाना तोंड देत शेतकरी शेती करतो, माल पिकवतो, परंतु भाव नसल्याने मात्र शेतकरी हतबल होताना दिसत आहे.
आता अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मेथी, कोथंबीरीचे दर मात्र कोसळले असल्याने शेतकऱ्याने आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहे. शेतकऱ्यांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकून देत संताप व्यक्त केला आहे.
नगरमधील एका शेतकऱ्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये चार हजार मेथीच्या जुड्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. या मेथीला केवळ 50 पैसे जुडीप्रमाणे दर मिळाला असल्याने त्यांचे गाडी भाडे देखील त्यात निघालेलं नाही.
त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी मेथी रस्त्यावरती फेकून दिली. आज एकीकडे देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे तर दुसरीकडे मेथी आणि कोंथिंबीरीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दैना झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोथंबीरीलाही कवडीमोल भाव
मेथीसोबत कोथिंबीरीला देखील कवडीमोल भाव मिळत आहे. सध्या कोथंबीरीलाही १ रुपये प्रति जुडी असा भाव मिळत आहे. सोलापूरमध्ये देखील अशीच स्थिती आहे. तेथेही कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून आली आहे.
सध्या मिळणाऱ्या अशा कमी भावामुळे त्यांचा लागवडीचा व मार्केटपर्यंत आणण्याचे भाडे खर्चही निघेना अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यंदा पाऊस कमी झाला. वातावरणही पिकांना पोषक नव्हते. त्यामुळे पिके म्हणावे तसे आले नाहीत. आता कुठे भाजीपाला घेतला तर त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आता शेतकरी संतप्त होताना दिसत आहेत.