येत्या 4 महिन्यांत लोकसभा निवडणुका होतील – रामदास आठवलेंचा दावा
छत्रपती संभाजीनगर

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून विविध पक्ष निवडणुकांच्या तयारीसाठी जाहीर सभांचे आयोजन करत आहेत. अाता येत्या चार महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होतील. महिलांना आरक्षणाचा लाभ २०२९ च्या निवडणुकीत होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मंत्री आठवले रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले हाेते. दुपारी साडेचार वाजता त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकारचा कालावधी एक वर्ष राहिला आहे. त्यामुळे शिंदे सरकारने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करावा, महामंडळ वाटप लवकर करावे. कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी. एक मंत्रिपद आमच्या पक्षाला देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली अाहे.
शिष्यवृत्ती वाढीसाठी प्रयत्न सुरू
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. दलितांवर अत्याचार वाढले आहेत. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्यांनी गावागावात ठराव घ्यावेत. महागाईच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कमी असून ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मला शिर्डी मतदारसंघात लढण्याची इच्छा आहे. तिथून मी जिंकून येऊ शकतो. यासाठी प्रयत्न करत असल्याचे आठवले म्हणाले. या वेळी पक्षाचे नेते बाबूराव कदम, मिलिंद शेळके आणि नागराज गायकवाड उपस्थित होते.