
नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात सूचना केल्याचे समजले. अर्बन बँकेतील गैरव्यवहाराची व्याप्ती, आरोपींची वाढणारी संख्या, आर्थिक गुन्ह्याची क्लिष्टता या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. एसआयटी प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी तपासी अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्याकडेच राहणार आहे, त्यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक व पाच पोलीस अंमलदार यांचा पथकात समावेश आहे.
एसआयटी पथक स्थापन झाल्याने या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळणार आहे. बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिटही झाले असून घोटाळ्याचा आकडा २९१ कोटींवर गेलेला आहे.
या गुन्ह्यात बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आता या गुन्ह्यात अधिकारी व कर्मचारी अशा ६ जणांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटीसा आर्थिक गुन्हे शाखेने बजावल्या आहेत. ते हजर न झाल्याने पुन्हा नोटीसा काढण्यात आल्या आहेत.
दरम्यान शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला सनदी लेखापाल विजय मर्दाचा अर्बन बँक फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याने त्याला अर्बन फसवणुकीच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासंदर्भात फिर्यादी राजेंद्र गांधी यांनी पोलिसांना अर्ज दिला होता. पोलिसांनी त्याला अर्बनच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले नसल्याने फिर्यादी गांधी यांनी मर्दाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात तसा अर्जही दिला होता. त्यावर न्यायालयाने पोलिसांना ३० जानेवारीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.