मयूर पालकर यांच्या मयूरस्पर्श पुस्तकास कै भास्कर मुणनकर ‘लेखन प्रेरणा’ पुरस्कार प्रदान

मराठी राजभाषा दिनाचे औचित्यसाधून साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन अलिबाग येथे नुकतेच पार पडले.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे.मराठीसाठी झटणाऱ्या आणि मराठी साहित्यक्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या काही निवडक संस्थांचा, लेखकांचा आणि पुस्तकांचा देखील सन्मान सदर साहित्य संमेलनात करण्यात आला.
समाजात आशावाद पसरविणाऱ्या काव्य, कथा , संकीर्ण,आत्मचरीत्रपर संग्रह अश्या विविध पुस्तकांना सन्मानित करण्यात आले.त्या अंतर्गत ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार – २०२५” चा मान मयूर पालकर यांच्या “मयूरस्पर्श” पुस्तकास बहाल करण्यात आला. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार ए के शेख, उदघाटक आदर्श नागरी पतसंस्थाचे संस्थापक सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी,रायगड भूषण कवी व लेखक श्री रमेश धनावडे, ज्येष्ठ साहित्यिक एल.बी पाटील, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष किसन पेडणेकर यांनी पुरस्कार विजेत्या साहित्यिकांना शुभेच्छा दिल्या.
मयूर पालकर हे मुंबईतील सांताक्रूझ विभागातील असून अभियंता म्हणून नोकरी करत आहेत. त्यांनी आपल्या लिखाणामागची प्रेरणा त्यांची बहीण आहे असे सांगताना आपल्या मातोश्री सौ कल्पना पालकर यांना पुरस्काराचे श्रेय बहाल केले.