लेख – अळवावरचे पाणी….
लेखन - हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली यांनी खुपच सुंदर पध्दतीने मांडले आहेत.

प्रत्येक जण आपआपल्या स्वभावाप्रमाणे जीवन जगत असतो.स्वभाव हा त्या व्यक्तीचा मूळचा असतो. कितीही प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीचा स्वभाव बदलू शकत नाही.पण हे आपल्याला कधी कळणार जीवन म्हणजे काय तर अळवावरचे पाणी असते. ते कधी मातीमध्ये मिसळून जाईल सांगता येत नाही .
त्याप्रमाणे जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटेल तेही सांगता येत नाही. पण अळवावरचं पाणी जोपर्यंत अळवावर असतं तोपर्यंत त्याला हिऱ्याची चमक असते किती छान पणे तो टपोरा थेंब हे त्याचे क्षणभंगुर आयुष्य जगत असतो हो ना? अहो ,आपली संपत्ती,पैसा,तुमचा रुबाब,तुमचा मोठा हुद्दा,तुमचे समाजातील प्रतिष्ठित स्थान हे सर्व आपल्याला शेवटी बरोबर घेऊन जाता येत नाही. तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागा,रुसणे, फुगणे,एखाद्याचा दुःस्वास करणे,अहंकाराच्या भरात एखाद्याचा अपमान करणे हे सर्व सोडून द्या.कारण आज तुम्ही मोठ्या मर्सिडीज गाडीतून फिरत असले तरी शेवटी म्युन्सीपालटीच्या गाडीतूनच स्मशानात जावे लागते.राव आणि रंक दोघांनाही एकाच ठिकाणी जावे लागते हो ना? म्हणून हे क्षणभंगुर आयुष्य आनंदाने, प्रेमाने जगा .दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव…!!आपल्यालाही असं छानपणे जगता आलं पाहिजे, दुःख झेलता आलं पाहिजे, संकट पेलता आलं पाहिजे, दुःखाच्या डोंगरावर सुखाचं झाड लावता आलं पाहिजे.. तरच आपण जीवनात आनंदी होऊ शकतो .
आणि हा मनस्वी आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे .कारण पुन्हा पुन्हा मानवी जन्म मिळत नाही, मिळालेल्या या जन्माचा आपल्याला सार्थक करता आले पाहिजे,येणारा क्षण आपला असतो ..
अळवावरच्या पाण्यासम
सुखदुःख आयुष्याची
रित्या ओंजळीत वेचू
भावफुले समर्पणाची…