निवडक लेख – निघालास बाप्पा
सौ.सायली यांनी अतिशय सुंदर असे लेखन केले आहे.

निघालास बाप्पा किती लवकर संपला ना तुझा मुक्काम जरा जास्त सुट्टी टाकून येत जा ना…रोजच्या धावपळीत तुझ्याजवळ निवांत बसायलाच मिळाले नाही.
रोज तुझ्यासाठी किमान अर्धातास काढेन, अस ठरवलं होत रे पक्क पण नाही जमलं.खूप गोष्टी मनातच राहून गेल्या.तुझ्या जवळ मनमोकळे करायचे होते ना…फक्त दुःखच नाही, आनंद ही सांगायचा होता ना..माहिती आहे केव्हाही आवाज दिला की हजर असतो तू,सगळे ऐकून घेतोस सुपासारख्या कानांनी,तुझ्या मोठ्या पोटात साठवतोस सगळे.नाहीतर आम्ही, एकाचे ऐकले की दुसऱ्याला केव्हा सांगू असे होते.
तुझ्या सारखे आचरण करायला शिकायचे आहे रे, समोर असलास ना की मग धाक असतो तुझा,कुणाबद्दल वाईट बोलले किंवा चिंतले जात नाही मनात,तू हवास ना समोर नेहमीच त्यासाठी.तुला रोज गोडाचा नैवेद्य करत होते. गोड प्रसादाबरोबर वाणीतही गोडवा आला होता. तो तसाच कायम टिकू दे. दूर्वा, फुले आणताना निसर्गाच्या सानिध्यात जात होते, असाच निसर्ग रोज पहाण्याची सवय लाव ना..
आरतीसाठी सगळे लहानथोर विविध जातधर्म विसरून एकत्र येत होते. कायम ही एकी टिकव ना..प्रसन्न आणि भारलेले वातावरण मनाला समाधान आणि आनंद देत होते. तो कायम ठेवशील ना..तू जातो आहेस, मात्र तुला मनात साठवते आता कायम.सगळ्यांसोबत रहा.चांगले ऐकून घेण्याची, चांगले पहाण्याची, गोड बोलण्याची, एकोपा टिकवण्याची, निसर्गाच्या सानिध्यात रोज जाण्याची सवय मात्र अशीच राहू दे.
कायम तुझी कृपाशिर्वादाने माझी ओंजळ भरलेली राहू दे.निघालास ना तू , पण प्रत्येकात मला तू दिसावास अशी दृष्टी मात्र देऊन जा.
देशील ना बाप्पा..तुझी लाडके आम्ही सगळे, पुन्हा येण्याच्या प्रतिक्षेत..
स्वरचित लेखन.
सौ.सायली सुहास देशपांडे.
9420953924
अहमदनगर.