
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी दर मिळत होते. त्यामुळे अनेकांनी आहारातून टोमॅटो घेणेच बंद केले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति कोलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आगामी काळात नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणार आहेत.
नवीन टोमॅटो बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढून टोमॅटोचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे पुढेही असेच भाव टिकून राहातील अशी अपेक्षा बाळगुन अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली.
मात्र आता भाव कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहीला आहे. तर दुसरीकडे गेल्या एक महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतीतील पिकांनी आता माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आहेत ती पिके करपत आहेत त्यामुळे पुढील पिकांचा विषयच नाही. एकीकडे पिण्याच्यासाठी पाण्याची चिंता असताना आता शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर शेतमालाची आवक घटल्याने महागाई वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.