
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सीना पाणी येऊनही त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याची चर्चा सध्या सीना लाभक्षेत्रात सुरु आहे.
सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. भोसा खिंडीतून पाच सप्टेंबरपर्यंत हे पाणी सीना धरणात पोहोचणार आहे. हे पाणी ४०० क्युसेकने सोडण्यात येणारे आहे. पाच ते १३ सप्टेंबरपर्यंत हे पाणी येणार आहे. परंतु सद्य स्थितीला धरणातील उपयुक्त साठा ४.१५ टक्यांपर्यंत आला आहे. त्यातही गाळाचे प्रमाण जास्त आहे.
यामुळे आठ दिवस पाणी येऊन देखील याचा सीना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याची चर्चा सुरु आहे. सध्या पिण्यासाठी पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात आहे. या धरणातील पाण्यावर तीन तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहेत. धारण क्षेत्रात झालेल्या अत्यल्प पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. खरिपाची बहुतांश पिके जळायला लागली आहेत.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील बिकट झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून धरणात पाणी सोडण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, माजी सरपंच दीपक भांबे,युवानेते अनिल पांडुळे, डॉ चंद्रकांत कोरडे आदींनी केली होती. त्यावेळी धरणात उपयुक्त साठा देखील जास्त होता. त्याच वेळी पाणी सोडण्यात आले असते तर उपयुक्त जलसाठ्यातून शेतीसाठी आवर्तन देखील सोडता आले असते.आता धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उपयुक्त जलसाठ्यात आवर्तन सोडता येईल इतकी वाढ होणार नाही. त्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही.
सीना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच प्रामाणिक हेतू असेल तर किमान २० दिवस तरी सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सीना धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये अद्याप मुबलक पाऊस पडलेला नाही. पिकांची अवस्था दयनीय आहे. मिरजगाव या गावाची पाणी योजना या धरणामधून आहे. यामुळे या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. परंतु किमान २० दिवस तरी पाण्याची आवक सुरु राहिली पाहिजे.- परमवीर पांडुळे, माजी सदस्य, जिल्हा परिषद