स्क्रॅप मालाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करून तब्बल साडेचार कोटी रुपयांची खंडणीचा प्रकार
अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील स्क्रॅप मालाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांना मारहाण करत तब्बल साडेचार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध शनिवारी (6 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश बोगा (वय 39, रा. श्रावस्ती बंगला, विद्या कॉलनी, आदर्शनगर, नेप्ती सबरबंद, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजबीर गजराजसिंग मल्होत्रा, जुगन राजबीर मल्होत्रा (दोघे रा. मौर्य पार्क, वाडेबोल्हाई, वाघोली, पुणे), शिवाजी चंद्रकांत थोरवे (रा. आळंदी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, 29 मे 2026 रोजी पहाटे एकच्या सुमारास संशयित आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या राहत्या घराजवळ गाठले. स्क्रॅप मालाचा व्यवहार न केल्याच्या रागातून संशयित आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने वाहनात बसवून नेल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपींनी फिर्यादींचे दोन मोबाईल तसेच खिशातील तीन हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना आळंदी येथील एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तुझ्यामुळे आमचे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ते पैसे भरून दे, अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप आहे.




