
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार नीलेश लंके यांच्याविरूद्ध निवडणूक याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात यावर सुनावणी सुरू होती. बराच काळ ही याचिका प्रलंबित राहिली. खासदार लंके यांनी निवडणुकीत गैरमार्गाचा वापर केल्याने त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
बुधवारी (८ एप्रिल) या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने डॉ. विखे यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईतही लंके यांनी बाजी मारली आहे.
विखे यांनी २०२४ मध्येच ही याचिका दाखल केली. त्यावेळी इतरही अनेक ठिकाणी अशा याचिका दाखल झाल्या होत्या. त्या पूर्वीच फेटाळण्यात आल्या आहेत. नगरची ही याचिका मात्र प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिली होती. अखेर तिचा निकाल आला.
विशेष म्हणजे यामध्ये विखे यांनी फक्त विजयी उमेदवार लंके यांनाच प्रतिवादी केले होते. सहसा निवडणूक याचिकेत निवडणूक अधिकऱ्यांना आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रतिवादी केले जाते. त्यामुळे त्यांनाही कोर्टात बाजू मांडण्यासाठी यावे लागते. या याचिकेत तसे नव्हते.



