मंदिरांच्या भूमींचे भूमाफियांपासून रक्षण करण्यासाठी कठोर कायदा करा.
अहिल्यानगर जिल्ह्यात ८० हून अधिक मंदिर विश्वस्तांचे शासनाला निवेदन

हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या मंदिरांच्या भूमी भूमाफियांकडून हडप केल्याच्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यावधी किमतीच्या जमिनींची कवडीमोल किंमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत.
मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग अॅक्ट’ कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी, श्रीगोंदा तालुक्याचे आमदार श्री. विक्रमसिंह पाचपुते, विभागीय प्रांताधिकारी, श्रीरामपूर, संगमनेर, तसेच तहसीलदार – राहुरी, पाथर्डी, कर्जत, आष्टी यांना ८० हून अधिक मंदिर विश्वस्तांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नावे निवेदन दिले आहे. हा कायदा तात्काळ लागू करावा आणि विशेष तपास पथके (SIT) स्थापन करावीत अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
देवस्थान इनाम जमिनी या कायद्याने अहस्तांतरणीय असूनही, भूमाफियांनी स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या आहेत. इनाम रजिस्टर आणि गाव नमुना ३ मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून देवस्थानांची नावे वगळण्यात आली आहेत.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ नुसार देवस्थान जमिनींना मिळालेले संरक्षण डावलून, कुळांच्या नावाखाली एक-एक करून हजारो एकर जमिनी छुप्या पद्धतीने गिळंकृत करण्याचा सपाटा चालू आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात जमीन हडपणे, हा गंभीर फौजदारी गुन्हा मानणारा सक्षम कायदाच नाही. याउलट, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसाम यांसारख्या राज्यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षांपूर्वीच फौजदारी स्वरूपाचा ‘अँटी लॅन्ड ग्रॅबिंग अॅक्ट’ लागू केला आहे.
याच प्रकारे असा दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा. विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून महाराष्ट्रातील मागील २० ते २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणांची सखोल चौकशी करावी.
या कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालये स्थापन करावीत. खटले सहा महिन्यात निकाली काढावेत, जेणेकरून देवस्थानांना त्वरित न्याय मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने विदर्भातील अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांतील अनेक देवस्थानांच्या बळकावलेल्या अनेक एकर जमीन देवस्थानला मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा दिला आहे. देवस्थानांच्या जमीनी बळकावण्याच्या प्रकारांविरोधात शासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे देवस्थानांचे रक्षण करण्याची कणखर व ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे.
आपले नम्र – बापू ठाणगे – (संपर्क ९४२२२२९८९७)
निवेदन दिलेली नावे –
१) श्रीगोंदा भा ज प आमदार यांना निवेदन देतांना मंदिर विश्वस्त व मंदिर महासंघाचे पदाधिकारी
२ )अहिल्यानगर तहसीलदार श्री मयूर बेरड याना निवेदन देताना मंदिरात विश्वस्त व मंदिर महासंघाचे पदाधिकारी
३) कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील तहसीलदार श्री रवी सतवन याना निवेदन देताना मंदिर विश्वस्त व मंदिर महासंघाचे पदाधिकारी
४ )पाथर्डी येथील तहसीलदार श्री पाटील याना निवेदन देताना मंदिर विश्वस्त व मंदिर महासंघाचे पदाधिकारी




