
थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस बरसला. तसेच तामिळनाडूत आलेल्या मिचॉँग वादळामुळे हवामान अन् वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे. आता थंडीतही याच परिस्थितीचा सामना नांदेडकर करत आहेत.
अशा अवकाळी पावसामुळे बदललेल्या वातावरणात रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यापासून तर त्वचेच्या आजारांसह अॅलर्जी आणि श्वसनविकार, दमा, फुफ्फुसाच्या समस्या, मानसिक विकार वाढण्याची जोखीम आहे.
हवेतील गारवा असलेले वातावरण संसर्ग रोग पसरविणारे विषाणू वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हवेत गारवा आल्याने झालेला बदल लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक आहे. मुलांसह ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
विशेषतः श्वसनमार्गासह संसर्ग आजार व दमाग्रस्तांना त्रास जाणवतो. कीटकांचे संक्रमण आणि जलजन्य रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे दमासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्येष्ठांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांना लक्षात घेत आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे.
पिके आली संकटात
प्रदूषणाचा एक्यूआयही वाढत आहे. ज्यामुळे आरोग्याची समस्या उद्धभवू शकण्याची शक्यता आहे. दमा आणि संधिवात असलेल्या वृद्धांना या वातावरणाचा अधिक त्रास जाणवू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या हवामान बदलाचा फटका फळ व भाजीपाल्याला बसणार असून सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके संकटात आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.